लवकरच एकता कपूरची एक नवीन मालिका टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कुमकुम भाग्य’ नावाची ही मालिका प्रेम कथेवर आधारीत आहे. सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या ‘पवित्र रिश्ता’ या एकता कपूरच्याच मालिकेच्या ठिकाणी ही नवीन मालिका दाखवली जाणार असून, ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. अभिनेता शब्बिर अहुवालिया या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. रॉक स्टारच्या भूमिकेतील शब्बीरबरोबर बालिका वधू फेम अभिनेत्री श्रीती झा या मालिकेत दिसणार आहे. जेन ऑस्टिनच्या ‘सेन्स अॅण्ड सेन्सिबिलिटी’वरून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेचे कथानक आपल्या दोन मुलींना लग्न करून सुखासमाधानाचे आयुष्य लाभण्याची आशा बाळगून असलेल्या लग्न-सभागृह चालविणाऱ्या स्त्री पात्राच्या भोवती फिरते. यावेळी बोलताना एकता म्हणाली, ‘पवित्र रिश्ता’ मालिकेला ४ वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असून, निर्माता म्हणून या मालिकेचा प्रवास माझ्यासाठी समाधानकारक होता. ‘क्योकी सांस भी कभी बहु थी’ या मालिकेनंतर जर कोणती मालिका माझ्या हृदयाच्या जवळ असेल तर ती ‘पवित्र रिश्ता’ ही आहे… ‘कुमकुम भाग्य’ ही एक अतिशय भावूक प्रेमकथा असलेली मालिका असल्याचे तिने सांगितले. ‘कुमकुम भाग्य’ ही नवी मालिका दर दिवशी रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल, तर सध्याची ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका संध्याकाळी ६.३० या नव्या वेळेला प्रसारित होईल.