छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. हा शो सुरु होऊन आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. शोमधील प्रत्येक स्पर्धक मोठ्या जिद्दीने ‘बिग बॉस’च्या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अभिनेत्री गौहर खान हिला मात्र शोमध्ये दिर्घ काळ टिकून राहता आलं नाही. तिसऱ्याच आठवड्यात ती शोमधून एलिमिनेट झाली. लक्षवेधी बाब म्हणजे शोमधून बाहेर पडताच तिने पवित्रा पुनियावर निशाणा साधला. “पवित्राने मला गलिच्छ शिव्या घातल्या” असा आरोप गौहरने केला आहे.

आज तकला दिलेल्या मुलाखतीत गौहरने पवित्राबाबत संताप व्यक्त केला. ती म्हणाली, “पवित्रा खूप चांगली स्पर्धक आहे असं मला वाटलं होतं. पण माझा भ्रमनिरास झाला. ती खूप स्वार्थी आहे. स्वत:च्या नफ्यासाठी ती कोणालाही फसवू शकते. मी एलिमिनेट झाल्यानंतर तिने आनंद व्यक्त केला. शिवाय मला अत्यंत गलिच्छ शिव्या देखील घातल्या. हिंमत असेल तर तिने मला समोर येऊन शिव्या घालाव्या. मला आनंद आहे की तिचा खरा चेहरा लवकरच समोर आला.”

गौहर खान बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये विजेता ठरली होती. यंदाच्या पर्वात नव्या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी तिला आमंत्रण मिळाले होते. मात्र या संधीचं तिला सोनं करता आलं नाही. तिसऱ्याच आठवड्यात ती शोमधून एलिमिनेट झाली. शोमधील ज्युनिअर स्पर्धकांविरुद्ध झालेल्या एका टास्कमध्ये तिची टीम हरली. परिणामी नियमानुसार तिला बाहेर पडावं लागलं.