‘ससुराल गेंदा फूल’ या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री रागिनी खन्ना हिने चाहत्यांच्या मनात स्वत:च विशेष स्थान निर्माण केलं आहे. काही काळ रागिनी छोट्या पडद्यापासून दूर गेली होती. मात्र आता तिने पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. रागिनी लवकरच ‘जज्बात’ या कार्यक्रमामध्ये दिसणार आहे. या कार्यक्रमाविषयी बोलताना तिने तिच्या मामा गोविंदाविषयी एक खुलासा केल्याचं पाहायला मिळालं आहे.

रागिना खन्ना ही अभिनेता गोविंदाच्या बहीणीची मुलगी आहे. त्यामुळे रागिनीने छोट्या पडद्यावर पदार्पण केल्यानंतर ती गोविंदाच्याच मदतीने इथपर्यंत पोहोचल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. मात्र यावर अखेर रागिनीने तिचं मौन सोडलं आहे. गोविंदाची भाची असूनदेखील माझ्या करिअर करताना माझ्या नशीबातील स्ट्रगल मला चुकलेला नाही, असं रागिनीने यावेळी सांगितले.

‘मी गोविंदाची भाची आहे. त्यामुळे मला आरामात या क्षेत्रामध्ये पदार्पण करता आलं किंवा चांगल्या मालिका मिळाल्या असं अनेकांच मत होतं. त्याबाबत त्यांना मला तसं स्पष्ट बोलूनही दाखवलं होतं. मात्र हे सत्य नाही. आज मी ज्या ठिकाणी पोहोचले आहे.ते माझ्या स्वत:च्या हिमतीवर आहे. माझ्या मागे कोणताही गॉडफादर नव्हता. मामांनी कधीही त्यांच्या मुलांना मदत केली नाही. तर ते मला कशी काय मदत करु शकतात. त्यांनी कायम मुलांना स्वावलंबी होण्याचा सल्ला दिला, असं रागिनीने यावेळी सांगितलं.

पुढे ती असंही म्हणाली, ज्या लोकांना असं वाटतंय की मला गोविंदा यांच्यामुळे कामं मिळतात.तर त्यांनी कृपा करुन आधी नीट माहिती काढा आणि मगच या विषयावर बोला. ‘जज्बात’ या कार्यक्रमामध्ये रागिनी सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसून येणार आहे.