बदलत्या काळानुसार चित्रपटसृष्टीची संकल्पना बदलत चालली आहे. वेगवेगळे विषय आणि कथानक चित्रपट दिग्दर्शक हाताळतांना दिसत आहेत. त्यामुळे चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलाकारांसाठी नव्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यातच मराठी चित्रपटांनादेखील आता सुगीचे दिवस आल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अभिनेत्री शांती प्रिया सुद्धा मराठी चित्रपटांच्या प्रेमात पडली असून तिला मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचं तिने नुकतंच सांगितलं आहे.

बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेल्या शांती प्रियाला मराठी चित्रपटांमध्ये काम करायचं असून ती चांगल्या कथानकाच्या शोधामध्ये आहे.” मला मराठी चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल, सध्या मी चांगल्या आणि महत्वाच्या भूमिकांच्या शोधामध्ये आहे. मात्र ज्या क्षणी मला उत्तम भूमिका साकारण्याची संधी मिळेल. त्या क्षणी मी मराठी चित्रपटांमध्ये काम करेन”, असं शांती प्रियाने सांगितलं.

दरम्यान, नव्वदच्या दशकात शांतीप्रियाने हिंदी चित्रपट तसेच दक्षिण भारतीय भाषेतील चित्रपटात भूमिका साकारलीय. तिने ‘सौगंध’, ‘एक्के पे एक्का’, ‘मेहेरबान’,’ फूल और अंगार’, ‘मेरे सजना साथ निभाना’, ‘अंधा इंतकाम’, ‘वीरता’ अशा लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचप्रमाणे ‘अंजली’, ‘Naaku pellam kaaveri’ इत्यादी तमिळ, तेलुगू चित्रपटात भूमिका साकारलीय. कालांतराने ‘व्दारकाधीश भगवान श्रीकृष्ण’, ‘माता की चौकी’ या मालिकेतून तिने भूमिका साकारली होती.