बॉलिवूडसाठी प्रत्येक सणाचं महत्व काही औरच असतं. मग ती दिवाळी असो किंवा होळी. त्यातच आता होळीचा सण आल्यामुळे बॉलिवूडमध्ये कमालीचं उत्साहाचं वातावरण पसरल्याचं दिसून येत आहे. कलाविश्वामध्ये होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक कलाकारांच्या घरी होळी पार्टीचं आयोजनही केलं जातं. त्यातच अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घरी करण्यात येणारी पार्टी साऱ्या सेलिब्रिटींसाठी खास असते. या पार्टीमध्ये अनेक दिग्गज कलाकार मंडळी हजर असतात. याच पार्टीमधील एक किस्सा दिग्दर्शक करण जोहरने शेअर केला असून त्या घटनेनंतर करण आजतागायत रंगपंचपमी खेळत नाही.

गेल्या वर्षी एका रिअॅलिटी शोमध्ये करणने त्याच्या रंगपंचमीबद्दल असलेल्या भितीविषयी सांगितलं होतं. बॉलिवूडमधील एका अभिनेत्यामुळे त्याच्या मनात रंगपंचमीबद्दल भिती निर्माण झाली असून तो आजही होळीपासून चार हात लांब असतो. विशेष म्हणजे करणला भिती वाटण्यामागचं कारणंही तसंच आहे. रंगपंचमी खेळत असताना अभिनेता अभिषेक बच्चनने करणला पाण्यात ढकललं होतं. तेव्हापासून करणला रंगपंचमी खेळायची भिती वाटते.

“अमिताभ बच्चन यांच्या घरी गेल्या कित्येक वर्षांपासून होळी पार्टीचं आयोजन करण्यात येतं. मी १० वर्षांचा असताना त्यांच्या घरी असाच होळी पार्टीसाठी गेलो होतो. मात्र लहान असल्यापासून मला रंग खेळणं अजिबात आवडत नाही. तरीदेखील मी अमिताभ बच्चन यांच्या घरी गेलो होतो. यावेळी अभिषेकने मला थेट स्वीमिंग पूलमध्ये ढकललं होतं. तेव्हापासून माझ्या मनात रंगपंचमीविषयी प्रचंड भिती बसली आहे. त्यामुळे मी आजही रंग खेळत नाही”, असं करणने सांगितलं.

पुढे तो असंही म्हणाला, “हा किस्सा घडल्यानंतर मी रंगपंचमी खेळणं सोडलं. मात्र आमच्या मैत्रीमध्ये यत्किंचितही फरक पडलेला नाही. आमची मैत्री आजही कायम आहे”.