अमिताभ बच्चन यांनी आजवरच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. त्यापैकी ‘जंजीर’ हा त्यांचा एक महत्त्वपूर्ण चित्रपट. या चित्रपटातील बिग बींचा अभिनय आणि संवादकौशल्याने अनेकांची मनं जिंकली. खरं तर जंजीर हा चित्रपट मिळण्यापूर्वी त्यांचे काही चित्रपट हे सलग बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले होते. मात्र, तरीदेखील जावेद-सलीमच्या जोडीनं जंजीरसाठी बिग बींची निवड केली. विशेष म्हणजे एका खास कारणामुळे बिग बींची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे केबीसीच्या मंचावर बिग बींनी ही भूमिका मिळण्यामागील किस्सा सांगितला आहे.

अलिकडेच झालेल्या केबीसीच्या भागात बिग बींनी स्पर्धकाला ‘जंजीर’ चित्रपटाविषयी एक प्रश्न विचारला होता. या प्रश्नानंतर बिग बींनी या चित्रपटाशीनिगडीत त्यांचा एक किस्सादेखील शेअर केला. विशेष म्हणजे च्युइंगम खाण्यामुळे बिग बींना हा चित्रपट मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- लग्नाआधी बिग बींनी लिहिले होते लव्ह लेटर, केबीसीमध्ये सांगितला किस्सा

“त्याकाळी माझे काही चित्रपट हे सलग बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत होते. मात्र, त्याचवेळी मला ‘जंजीर’चे लेखक जावेद-सलीम यांनी चित्रपटात मुख्य भूमिका करणार का असा प्रश्न विचारला. खरं तर माझे चित्रपट अपयशी ठरत असताना या चित्रपटात मला मुख्य भूमिकेसाठी का विचारतायेत हा प्रश्न मला पडला होता. त्यामुळे त्यामागचं कारण मी जावेद-सलीम यांनी विचारलं”, असं बिग बी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “माझे चित्रपट अपयशी ठरत असूनदेखील तुम्ही मला मुख्य भूमिकेत का घेता असा प्रश्न मी विचारला. त्यावर जावेद यांनी मला त्या मागचं कारण सांगितलं. ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटात तुझा च्युइंगम खातानाचा एक सीन होता. त्यात तू च्युइंगम  खात उभा असतोस आणि काही जण येऊन तुला मारतात, पण तू पुन्हा उठून उभा राहतोस आणि च्युइंगम चघळू लागतो. तुझा हा सीन पाहिल्यानंतर तू जंजीरसाठी योग्य आहेस, असं आम्हाला वाटलं”.

आणखी वाचा- ‘या’ कारणामुळे बिग बींना वाटते ATM कार्ड वापरण्याची भीती

दरम्यान, ‘जंजीर’ हा चित्रपट त्याकाळी तुफान लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात बिग बींसोबत जया बच्चन, प्राण या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटातील यारी है ईमान ही कव्वाली चांगलीच गाजली.