नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यर्थी यांनी पत्नी सुमेधासह सोनी टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ शोच्या अंतिम भागात पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावली होती. यावेळी ‘हॉट सीट’वर बसून सत्यर्थी यांनी त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक किस्से सांगितले. अमिताभ बच्चन यांनी सत्यर्थी यांना त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल विचारले.

यावर बोलताना सत्यर्थी म्हणाले की आज तर तुम्ही आमची सर्व गुपितं उघड करुनच राहणार. यावेळी सुमेधा या कैलाश यांच्यासोबतच बसल्या होत्या. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा किस्सा सांगताना कैलाश म्हणाले की, माझे पहिल्यांदा लग्न झाले होते. त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

लग्नानंतर पहिल्या रात्री माझी पत्नी एका कोपऱ्यात पदर डोक्यावर घेऊन बसली होती. मला माहित नव्हते की काय बोलावे. पण ती फार सुंदर गाते हे मला माहित होते. म्हणून मी तिला एखादे गाणे गायला सांगितले. यावर तिने आधी मला गाण्याचा आग्रह केला. पण मी कधीच गाणे गायले नव्हते. कॉलेजमध्ये असताना कधी तरी शिट्टी वाजवली होती.

यानंतर माझ्या पत्नीने ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’ हे गाणे गायले. तिच्या या गाण्यानंतर मी ‘ओ मां, तुम कितनी अच्छी हो, कितनी सुंदर हो’ हे गाणे गायले आणि आमच्या संभाषणाला सुरूवात झाली. कैलाश सत्यर्थी यांच्या पहिल्या रात्रीचा हा किस्सा ऐकून तिथे उपस्थित सारेच हसायला लागले.