'परदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री महिमा चौधरीने ९० चं दशक गाजवलं. मात्र इंडस्ट्रीत तिच्यासोबत अन्याय झाल्याची भावना तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केली. 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत महिमाने 'सत्या' या चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत गौप्यस्फोट केला. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सत्या' या चित्रपटातील एका भूमिकेची ऑफर आधी महिमाला देण्यात आली होती. यासाठी तिला चित्रपट साइनिंगची रक्कमसुद्धा दिली होती. मात्र ऐनवेळी तिला कसलीच कल्पना न देता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी उर्मिला मातोंडकरला त्या भूमिकेसाठी घेतलं. "सत्या हा माझा दुसरा चित्रपट ठरला असता. चित्रपटाची साइनिंग रक्कमसुद्धा मी स्वीकारली होती. मला किंवा माझ्या मॅनेजरला एक फोन कॉल करून खरं काय ते सांगण्याची सभ्यतासुद्धा त्यांच्याकडे नव्हती. माझ्याशिवाय चित्रपटाची शूटिंग जेव्हा सुरू झाली तेव्हा मला माध्यमांकडून समजलं की उर्मिलाला माझ्याजागी घेण्यात आलं आहे", अशा शब्दांत महिमाने राग व्यक्त केला. महिमाने या मुलाखतीत दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरही आरोप केले आहेत. घई यांनी इतर निर्मात्यांना मेसेज करून माझ्यासोबत काम न करण्यास सांगितल्याचा खुलासा महिमाने केला. आणखी वाचा : सुभाष घईंबद्दल महिमा चौधरीचा मोठा खुलासा; म्हणाली. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘डार्क चॉकलेट’ हा महिमाचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर तिने बॉलिवूडमधून अचानक एक्झिट घेतली.