कलर्स मराठी वाहिनीवरील 'नवरा असावा तर असा' या मालिकेतील हर्षदा खानविलकरसाठी लहानपणापासूनच नवरात्रोत्सव खूप खास आणि महत्वाचा आहे. त्यामागचं कारण ती सांगते, 'घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत एक सात्विक, आनंदमय वातावरण असतं. तसेच आपण आईचा ‘अंबाबाईचा' उत्सव साजरा करतो. ज्या उत्सवाला आईचं स्वरूप आहे त्याचं महत्व प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वेगळं असतं तसंच माझ्यासाठी देखील आहे. नवरात्रीचा उद्देश खूप महत्वाचा ठरतो. 'चांगल्याचा वाईटावर विजय' ही खूप मोठी शिकवण आहे. मुळात आपण नवरात्री साजरी करत असताना मनावर हे बिंबवत असतो की आपल्याला वाईटावर विजय मिळवायचा आहे. खूप स्फूर्ती आणि शक्ती देणारा हा उत्सव आहे अस मला वाटतं.' नवरात्र कसा साजरा करते हेदेखील हर्षदाने सांगितलं. 'नवरात्रीचे नऊ दिवस माझा उपवास असतो. या नऊ दिवसांत मी मीठाचं अजिबात सेवन करत नाही. फक्त फलाहार करते. उपाशी राहून देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असतो असं काही नाही. पण नऊ दिवस छान वातावरण असतं. फलाहार आणि सात्विक आहार खाल्ल्याने मन शांत आणि प्रसन्न राहतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवीचा उत्सव आहे. त्यामुळे श्रृंगार आणि रंग याचं खूप महत्व आहे. त्यामुळे नऊ दिवस नऊ रंग, म्हणजे ज्यादिवशी जो रंग आहे त्या रंगाचे कपडे मी आवर्जून परिधान करते. नवरा असावा तर असा या मालिकेत आम्ही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नऊ स्त्रियांना बोलावलं आहे,' असं तिने सांगितलं.