‘पद्मावती’ हा चित्रपट कवितेवर आधारित असून, त्यातून इतिहासाची मोडतोड केलीच नसल्याचे स्पष्टीकरण काल दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी खासदारांच्या समितीपुढे दिले. भन्साळी आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी गुरुवारी ‘पद्मावती’ चित्रपटाचा वाद सोडवण्याच्या दृष्टीने खासदारांच्या समितीची भेट घेतली. वाचा : 'पद्मावती' वादावर अखेर सलमान खानही बोलला ‘पद्मावती’ हा चित्रपट कोणत्याच ऐतिहासिक घटनेवर आधारित नसून ‘पद्मावत’ या कवितेवर आधारला असल्याचे भन्साळी यांनी समितीसमोर स्पष्ट केले. सन १५४० मध्ये सूफी कवी मलिक मोहम्मद जायसी यांनी ही कविता रचली होती. तर सेन्सॉरचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी दुसऱ्या समितीला दिलेल्या माहितीप्रमाणे हा चित्रपट आता इतिहासकारांचा विशेष चमू पाहणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ‘पद्मावती’ चित्रपट पाहणाऱ्या समितीमध्ये इतिहासकारांचाही समावेश असेल. त्यानंतर चित्रपट निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डासमोर पुन्हा आपली बाजू मांडावी लागेल. यात हा चित्रपट पूर्णतः काल्पनिक कथानकावर आधारित असून, त्यात ऐतिहासिक घटनांचा समावेश नसल्याचे सिद्ध करावे लागेल. वाचा : सारिकाने घेतली लेकीच्या बॉयफ्रेण्डची भेट अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ३० सदस्यांच्या संसदीय समितीसमोर काल ‘पद्मावती’च्या वादावर चर्चा करण्यात आली. या समितीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, परेश रावल, राज बब्बर यांचा समावेश होता. यावेळी समितीकडून भन्साळींना विविध प्रश्न विचारण्यात आले. चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन पूर्ण झालेले नसतानाही तो सेन्सॉरपुढे कसा पाठवण्यात आला, चित्रपटाच्या नावे कोणता संदर्भ इतिहासात नमूद करण्यात आला होता का, आणि आला असल्यास तुम्ही इतिहासाची मोडतोड केली नाही असे कसे म्हणू शकता, असे बरेच प्रश्न भन्साळींना विचारण्यात आल्याचे समजते.