एस.एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटात अभिनेता प्रभासने साकारलेल्या अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबली यांचा दिलदारपणा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला होता. राज्यातील जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणारा राजा अशी चित्रपटात त्याची ओळख होती. प्रभासने तामिळनाडूतील शेतकऱ्यांना तब्बल ७५ लाख रुपयांची मदत केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रिअल लाइफमध्येही प्रभास तितकाच दिलदार आहे असं म्हणावं लागेल.

तामिळनाडूतील कडलुरू जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रभासने आर्थिक मदत केली. वादळाच्या तडाख्याने इथल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यांना ७५ लाख रुपयांची मदत केल्याची माहिती दाक्षिणात्य अभिनेता कार्थीने दिली. त्याच्या आगामी ‘खाकी’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कार्थीने प्रभासच्या या सामाजिक कार्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

https://www.instagram.com/p/BWFAKSZF5xd/

शेतकऱ्यांना केलेल्या मदतीचा गवगवा प्रभासने केला नाही. त्याची हीच गोष्ट चाहत्यांना सर्वांत जास्त आवडते. कार्थीने ही माहिती सर्वांसमोर आणल्यानंतर प्रभासच्या चाहत्यांमध्ये त्याच्याविषयी आणखी आदर आणि प्रेम निर्माण झालं असेल यात काही शंका नाही.