'प्यार दोस्ती है' असं शिकवणारा राहुल, मैत्रीसाठी स्वत:चं प्रेम त्याग करणारी अंजली दोन मित्रांची ताटातुट आपल्यामुळे झाली म्हणून स्वत:ला दोष देणारी टीना, असा तीन व्यक्तींच्या प्रेमाचा त्रिकोण गुंफलेली गोष्ट म्हणजेच 'कुछ कुछ होता है' होय. १९९८ साली प्रदर्शित झालेला करण जोहरचा हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे. काजोल, शाहरूख खान आणि राणी मुखर्जी हे त्रिकुटही या चित्रपटाच्यानिमित्तानं हिट ठरलं. नुकत्याच या चित्रपटाच्या सिक्वलबद्दल करणला एका रेडिओ कार्यक्रमात विचारण्यात आलं होतं. जर 'कुछ कुछ होता है'चा सिक्वल आलाच तर या चित्रपटात कोणते नवे चेहरे दिसतील असा प्रश्न करणला विचारला. त्यावर त्यानं चटकन रणबीर, आलिया आणि जान्हवीचं नाव सुचवलं. वयाच्या २४ व्या वर्षी करणनं या चित्रपटाची कथा लिहिली होती. आता सिक्वलसाठी तितक्याच तोडीची कथा मिळेल असं नाही मात्र कधी याचा सिक्वल आलाच तर रणबीर, आलिया आणि जान्हवी कपूरला माझी पहिली पसंती असेल असं करण म्हणला.