काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्यावरून प्रसिद्ध गायक सोनू निगमने 'धर्मनिरपेक्ष' भारतीयांवर हल्लाबोल केला आहे. पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यातील जवानांची संख्या ४० झाली असून या हल्ल्याविरोधात देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सोनू निगमने फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला. 'नमस्ते भारतीयांनो, काही सीआरपीएफचे जवान शहीद झाले, त्यावर तुम्ही खूप दु:ख व्यक्त करत आहात असं मी ऐकलंय. किती लोग होते ते? ४४ असो किंवा ४४०, तुम्हाला का दु:ख होत आहे? तुम्ही ते करा जे या देशात योग्य मानलं जातं, जे धर्मनिरपेक्षवादी करतात. यांसारख्या घटनांवर शोक, दु:ख व्यक्त करणं हे आरएसएस, बीजेपी, हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी संघटनांवर सोडून द्या. जे धर्मनिरपेक्ष लोक करतात ते तुम्ही करा. जर भारतात राहायचं असेल तर 'भारत तेरे टुकडे होंगे..अफजल हम शर्मिंदा है,' असे धर्मनिरपेक्ष विचार तुम्ही ठेवले पाहिजेत. इथे वंदे मातरम् वगैरे बोलणंसुद्धा चुकीचं आहे. सीआरपीएफचे जवानच तर शहीद झाले आहेत, यात कोणती मोठी गोष्ट आहे? इथे तर नमस्ते सुद्धा बोलू नका..लाल सलाम,' अशा शब्दांत सोनूने बोचरी टीका केली आहे. पुलवामा येथील लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याचा निषेध केला आहे.