बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित तांडव ही वेब सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली. मुंबईत या वेबसीरीज विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेशात अ‍ॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह ‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता सीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्विट करत माफी मागितली आहे.

‘तांडव’ या सीरिजद्वारे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात आहे. तसेच हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप काहींनी केले. आता आली अब्बास जफर यांनी तांडव वेब सीरिजच्या संपूर्ण टीमचा आणि क्रू मेंबर्सचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. जर कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी मागतो असे म्हटले आहे.

‘तांडव’ वेब सीरिजच्या एका दृश्यामध्ये मोहम्मद झिशान अयूब नाटकात काम करत आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. दरम्यान तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. या दृश्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.

हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.