बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान नवोदित लेखक, लेखिकांसाठी नवी संधी घेऊन आला आहे. आमिरनं नव्या लेखकांसाठी एक व्यासपीठ खुलं केलं आहे. ज्यामार्फत नव्या लेखक, लेखिकांना आपल्या कथा, पटकथा लिहण्याची संधी मिळणार आहे. ज्याची पटकथा परीक्षकांना आवडेल आणि जो या स्पर्धेत जिंकेल त्याला आपली कथा बॉलिवूडमधल्या मोठ्या दिग्दर्शकांसमोरही मांडता येणार आहे.
आमिरनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘सिनेस्तान’ असं या स्पर्धेचं नाव असून, या स्पर्धेमार्फत नवोदित लेखकांसाठी खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कथा पाठवण्याची अंतिम तारीख ही १५ जानेवारी २०१८ असणार आहे. राजकुमार हिरानी, जुही चतुर्वेदी, अंजुम राजाबली यांच्यासह स्वत: आमिर या स्पर्धेचा परीक्षक असेल. फक्त नवोदितच नाही तर इतर लेखकही यात सहभागी होऊ शकतात असं आमिरनं म्हटलं आहे. scriptcontest.cinestaan.com वर या स्पर्धेसाठी अर्ज करता येणार आहे. भाग घेतलेल्या स्पर्धकांतून पाच विजेते निवडण्यात येतील. विजेत्यांना ठराविक रोख रक्कम पुरस्कार म्हणून देण्यात येईल. तसेच बॉलिवू़डमधल्या कोणत्याही दिग्दर्शकासमोर आपली कथा मांडण्याची संधीही या स्पर्धेमार्फत विजेत्यांना मिळणार आहे.