दोघांत तिसरा किंवा तिसरी हा प्रकार कुठल्याही भाषिक चित्रपटांसाठी नवीन उरलेला नाही. त्याला आधुनिक काळाचे परिमाण द्यायचे ठरवले तरी त्यात नावीन्यता सापडणं तसं कठीणच. कथनाची शैली आणि कलाकारांचा अभिनय या दोन बाजू भक्कम असतील तर अशा परिचित कथाही कदाचित प्रेक्षकांना भुरळ घालू शकतील. नाहीतर जुन्या वळणाची कथा आणि त्याच पद्धतीने जाणारा चित्रपट यापलीकडे फारसे हाती लागत नाही, याची प्रचीती महेंद्र पाटील लिखित आणि उत्कर्ष जैन दिग्दर्शित ‘अष्टपदी’ हा चित्रपट पाहताना येते.

‘अष्टपदी’ या शीर्षकातून चित्रपटाची कथा काय आहे हे चटकन स्पष्ट होत नाही. शीर्षक उत्सुकता चाळवणारे असले तरी त्याबद्दलचं निरसन चित्रपट पाहताना शेवटच्या काही क्षणांत होते. अर्थात, चित्रपट प्रेम आणि लग्न याभोवती फिरतो याची कल्पना येणं साहजिक आहे. तर त्रिकोणी प्रेमकथा या चित्रपटात पाहायला मिळते. सावनी आणि अनिकेत या दोघांचीही संगीत विद्यालयात भेट होते. अनिकेतला शास्त्रीय संगीत शिकून मोठे गायक होण्याची इच्छा आहे. तर श्रीमंत घरात वाढलेल्या आणि उच्चशिक्षित अशा सावनीला वडिलांचा स्थिरस्थावर असलेला व्यवसाय सांभाळण्यापेक्षा शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेण्यात अधिक रस वाटू लागला आहे. हे दोघंही ज्या संगीत विद्यालयात शिकण्यासाठी एकत्र आले आहेत, त्या विद्यालयाची संस्थापक-शिक्षिका त्यांना तिच्याकडे संगीत शिकण्याआधी एक अट घालते. संगीत शिकत असताना कोणी प्रेमात पडायचं नाही. पण प्रेमात पडलेच आणि नातं पुढे नेणार असतील तर एकमेकांच्या कलेच्या आड यायचं नाही. ज्या क्षणी आपण जोडीदाराच्या कलेच्या आड येतो आहोत याची जाणीव होईल, त्याचवेळी प्रेमाचा त्याग करायचा ही अट विद्यालयातील इतर मुलांसह अनिकेत आणि सावनी दोघंही मान्य करतात. मात्र, अगदी थोड्याच दिवसांत अनिकेत आणि सावनी एकमेकांच्या प्रेमात पडतात. ताईकडे जाऊन कबुलीही देतात आणि तिची अट पूर्ण पाळली जाईल, असं आश्वासनही देतात. मात्र, या दोघांच्या प्रेमात सावनीच्या वडिलांच्या इच्छेमुळे विक्रम चौधरी नावाचा मिठाचा खडा पडतो. काहीही झालं तरी मी तुझ्याशीच लग्न करणार, असं उलट आव्हान विक्रम सावनीला देतो. प्रेमाचा हा तिढा सुटतो का? सावनी आणि अनिकेत त्यांच्या ताईला दिलेलं वचन पाळतात का? त्यांच्या प्रेमाचा विजय होतो की दोघांच्या वाटा भिन्न होतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे हा चित्रपट.

वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रेमत्रिकोण हा चित्रपटांसाठी अजिबात नवीन विषय नाही. महेंद्र पाटील यांनी ‘अष्टपदी’ची पटकथा लिहिताना आजच्या काळाच्या अनुषंगाने जोडीदारांमध्ये ज्या ज्या विषयांवरून संघर्ष होतो त्यापैकी एका महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श करायचा प्रयत्न केला आहे. स्त्री आणि पुरुष यांच्या करिअरच्या वाटा, त्यांच्या कामाचे स्वरूप, दोघांपैकी एकाला मिळणाऱ्या आर्थिक – सामाजिक यशामुळे दुसऱ्याच्या मनात निर्माण होणारी न्यूनगंडाची भावना आणि त्यातून वाढत जाणारा विसंवाद हा आजच्या जोडप्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे खरा… ‘अष्टपदी’ या चित्रपटात हा विषय मांडताना कलेच्या अनुषंगाने याचा विचार लेखकाने केला आहे. त्यामुळे नाही म्हटलं तरी विषयाची व्याप्ती ही काही अंशी मर्यादित झाली आहे. असं असलं तरी कुठलंही नातं पुढे नेताना दोघांनी एकमेकांच्या करिअरचा आदर करणं, एकमेकांना सांभाळून घेत पुढे जाणं गरजेचं आहे. हा मुद्दा अधोरेखित करण्याचा लेखकाचा प्रयत्न वेगळा असला तरी त्यासाठी घातलेला कथेचा घाट आणि मांडणी ही जुन्याच पद्धतीची आहे. त्यातही तुलनेने चित्रपट सरधोपटपणे पुढे जातो.

लेखकाच्या कथेनुसार दिग्दर्शक उत्कर्ष जैन यांनी मांडणी केली आहे. छायाचित्रणातून वा पात्रांच्या मांडणीतून काहीएक नावीन्य आणता आले असते, मात्र तसा फारसा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला नाही. मांडणीची बाजू कदाचित कलाकारांच्या अभिनयाने सावरता आली असती, मात्र चित्रपटातली मुख्य जोडी म्हणजे सावनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मयूरी कापडणे आणि अनिकेतच्या भूमिकेतील अभिनेता अभिनय पाटेकर या दोघांमधला नवखेपणा प्राधान्याने जाणवतो. त्यातल्या त्यात अभिनेता संतोष जुवेकरने त्याच्या व्यक्तिरेखेतून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी मिलिंद फाटक, स्वप्निल राजशेखर, माधव अभ्यंकर असे अनुभवी कलाकारही आहेत, मात्र त्यांच्या व्यक्तिरेखेलाच मर्यादा असल्याने त्यांना फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. पटकथा, कलाकार, संगीत, छायाचित्रण या सगळ्याच आघाड्यांवर चित्रपट जुन्या वळणाने पुढे सरकतो. त्याचा कथाविषय मांडताना काहीएक सखोल वा सर्जनशील पद्धतीने मांडणी केली असती तर ‘अष्टपदी’चा प्रभाव अधिक चांगला पडला असता.

अष्टपदी

दिग्दर्शक – उत्कर्ष जैन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलाकार – संतोष जुवेकर, मयूरी कापडणे, अभिनय पाटेकर, मोना कामत, मिलिंद फाटक, स्वप्निल राजशेखर आणि माधव अभ्यंकर.