बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच बॉलिवूडसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कॅन्सरवर मात करत भारतात परतल्यानंतर इरफान खान पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करेल असा विश्वास सगळ्यांना होता. मात्र वयाच्या ५३ व्या वर्षी इरफान खान यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ‘अंग्रेजी मीडियम’ हा इरफान खान यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

आजारामुळे दोन वर्ष रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेले इरफान ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांसमोर आले होते. मात्र या वेळी मी तुमच्याबरोबर असेनही आणि नसेनही.. अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी व्यक्त केल्या होत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्याचा आनंद आपल्या मनात आहे, त्यापलीकडे नेमकं मनात आता काय चाललं आहे हे शब्दात सांगणं कठीण आहे, असं म्हणणाऱ्या इरफान खान यांच्या नव्या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. इरफान खान यांनी मात्र एकाच वेळी या सगळ्याशी जोडलेला असलो तरी त्यापासून अलिप्तही असल्याचंही सांगत होते.

इरफान खान यांनी आपल्या आजारपणाविषयीच्या भावना कधीही लपवून ठेवल्या नाहीत. उलट, ते सातत्याने त्याविषयी बोलत राहिले. त्यामुळे ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाच्या निमित्ताने बोलतानाही चित्रपटापेक्षा ते या दोन वर्षांच्या काळात कोणत्या अनुभवातून गेले आहेच, त्याविषयी भरभरून बोलताना दिसले होते. मी खूप व्यग्र होतो कामात.. इतका मी माझ्या दोन्ही मुलांना मोठं होताना पाहिलेलंच नाही. वेळ मला कायमच कमी पडत आला आहे, मात्र यातला विरोधाभास असा की वेळ कमी पडणं म्हणजे नेमकं काय याचा खरा अर्थ मला आता कुठे कळतो आहे.. त्यामुळे सध्या मी फक्त आशीर्वाद आणि माझ्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रार्थना यांचाच विचार करतो आहे, अशा शब्दांत इरफान खान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात इरफान खान यांनी आपल्या मुलीचं परदेशी शिकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन धडपडणाऱ्या वडिलांची भूमिका केली आहे. ही भूमिका आणि त्याचा वास्तवात सुरू असलेला झगडा यातले साम्य सांगताना त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मरणाच्या भीतीपेक्षा दुसरं वाईट काय असू शकतं? जगायचं आहे की मृत्यू जवळ करायचा आहे..? अत्यंत अशक्य परिस्थितीशी सामना करताना जे जे प्रयत्न केले जातात त्या सगळ्या गोष्टी मला जवळच्या वाटतात, त्या मी समजू शकतो. चमत्कारांवर माझा विश्वास आहे, न हरता चिकाटीने केलेल्या प्रयत्नांतून अशक्य ते शक्य करता येतं, यावर माझा विश्वास आहे. या चित्रपटात आपल्या मुलीसाठी काहीही करणाऱ्या वडिलांची व्यक्तिरेखा आहे ती अशीच जिद्द दाखवून देते.. असं त्यांनी सांगितलं होतं.

इरफान खान यांनी याआधीही अनेकदा वडिलांची भूमिका साकारली होती, मात्र ती प्रत्येक भूमिका वेगळी होती म्हणून त्या मी केल्या. प्रत्येक व्यक्तिरेखेची गोष्ट, त्याच्यासमोर असलेली परिस्थिती यात फरक आहे. आणि त्या परिस्थितीत लढणारा प्रत्येक बापही वेगळा आहे, तसा वेगळेपणा त्यात नसता तर मी या भूमिका केल्याच नसत्या, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. प्रत्यक्षातही ते दोन मुलांचे पिता होते. आजारपणामुळे त्यांना कुटुंबीयांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवता आला, मात्र याआधीही मी जेव्हा जेव्हा घरी असेन तेव्हा तेव्हा त्यांच्याबरोबर वेळ घालवत होतो, असं त्यांनी सांगितलं होतं. मी नेहमी मुलांशी वडिलकीच्या नात्याने वावरत असताना पारंपरिक चौकटी बाजूलाच ठेवल्या होत्या, मी कधीही त्यांच्याशी खूप कडक शिस्तीत वागलेलो नाही. मी त्यांच्यावर भरपूर प्रेम करत आलो आहे, त्यांच्याकडून कुठलीच अपेक्षा करायची नाही हे माझं धोरण मी कायम ठेवलं आणि मला आनंद वाटतो की, आज या सगळ्याची चांगली फळं मला अनुभवायला मिळत आहेत, असं त्यांना सागितलं होतं.

नेहमी भवतालात काय घडतं आहे याबद्दल एक माणूस म्हणून जागरूक राहणारे इरफान आपण स्वत:चाच नव्याने शोध घेण्यात रमलो आहोत, असं सांगत होते. मी हळूहळू पूर्वपदावर येतो आहे, मात्र सध्या काही फारसं वाचत नाही. बघण्यावर माझा जास्त भर असतो, असंही ते म्हणाले होते.