काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागाचैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने घटस्फोट घेतला. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. पण आता समांथा आणि नागाचैतन्यने घटस्फोट का घेतला? या मागचे कारण समोर आल्याचे म्हटले जात आहे.

बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, समांथाने अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा आगामी चित्रपट ‘पुष्पा’मध्ये आयटम साँग करण्यास होकार दिला आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गाण्याचे चित्रीकरण केले जाणार आहे. असे म्हटले जात आहे की समांथाने नागाचैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर आयटम साँग करण्यास परवानगी दिली आहे. तसेच नागाचैतन्य समांथाला अशा भूमिका आणि गाणी करु नकोस असे सांगत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळेच त्या दोघांनी घटस्फोट घेतल्याचे देखील म्हटले जात आहे.
आणखी वाचा : बॉलिवूडची ‘दामिनी’ सध्या काय करतेय? जाणून घ्या

समांथा ‘पुष्पा’ चित्रपटात आयटम साँग करणार असल्याची घोषणा केल्यानंतर ट्विटरवर #samantharuthprabhu ट्रेंड होताना दिसत होते. अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. काहींनी तिला पाठिंबा दिला तर काहींनी समांथाने चुकीचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

२००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.

२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे.