सडेतोड बोल, नृत्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रातली मास्टर म्हणून फराह खान बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. वेगवेगळ्या शोसाठी परीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या फराहला ‘एन्टरटेन्मेट के लिए कुछ भी करेगा’ सारख्या रिअ‍ॅलिटी शोला एवढे महत्व द्यावेसे का वाटते?, हा प्रश्न पडतो. फराहला मात्र या शोचे महत्व फार वेगळे आहे असे वाटते. आणि ते महत्व परीक्षक म्हणून काम केल्यानंतर अनुभवायला मिळाले होते, असे फराहने ‘रविवार वृत्तांत’शी गप्पा मारताना सांगितले.
‘एन्टरटेन्मेट के लिए कुछ भी करेगा’ या शोमध्ये लांबून-लांबून लोक येतात. त्यांना आपल्याकडे जे काही कलागुण आहेत ते दाखवायची संधी देणारा हा शो आहे. कोणी डोक्यावरून बाईक घेऊन जातो, कोणी डोळे बांधून निशाण्यावर चाकू मारण्यात पटाईत असतो, असं काहीही जे इतरांना शक्य नाही, असे मनोरंजन ते करून दाखवतात. त्याचा प्रेक्षकांना फायदा काहीच नसतो. केवळ पाहून हसणं, घाबरणं नाहीतर समोरच्याचे कौतूक करणं एवढाच मर्यादित उद्देश असतो. पण, अशाप्रकारे आपले कलागुण दाखवणाऱ्यांकडे फराह फार वेगळ्या दृष्टीने पाहते. प्रत्येकाला उत्तम गाणं गाता येत नाही, प्रत्येकाला उत्तम नाचता येत नाही, प्रत्येकाला साहसी खेळांमध्ये प्राविण्य दाखवता येत नाही. पण, तरीही प्रत्येक माणसाकडे स्वत:ची अशी काही ना काहीतरी कला असते, गुण असतो. आणि त्यांना आपली ती कला म्हणजे सर्वस्व वाटत असतं. ‘एन्टरटेन्मेट के लिए कुछ भी करेगा’ हा शो म्हणजे अशा कितीतरी लोकांसाठी मोठे व्यासपीठ आहे, असे फराहने सांगितले.
सुरूवातीला परीक्षक म्हणून काम करताना माझाही दृष्टिकोन फार वेगळा नव्हता. पण, हळूहळू जाणवलं की या शोमध्ये देशभरातील दुर्गम भागातूनही लोक आपली कला दाखवण्यासाठी येतात. आपल्याला वाटत असतं यात काय मोठं आहे असं.. पण, त्यांच्यासाठी त्यांना ही कला टीव्हीवर दाखवता येणं फार मोठी गोष्ट असते. आपल्या गावातला माणूस टीव्हीवर दिसला, हे कळलं की गावात अक्षरश: त्यांची मिरवणूक काढली जाते आणि त्यांच्या कलेलाही सर्वमान्यता मिळते. या शोची नाळ ही अशी अगदी तळागाळातल्या लोकांपासून वरती प्रत्येकापर्यंत जोडली गेलेली आहे. त्यांचे अनुभव ऐकताना, पाहताना कित्येकदा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. या शोने माझे विचार बदलून टाकले आणि म्हणूनच मी आजपर्यंत या शोच्या प्रत्येक पर्वाशी जोडलेली आहे, असे फराहने सांगितले. खरेतर, फ राह सध्या आपल्या ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. त्यामुळे चित्रिकरण सांभाळून टीव्हीवरच्या शोसाठी वेळ देणे कितपत शक्य आहे?, असे विचारताच तिने केवळ या शोसाठी म्हणून सोनी वाहिनीने माझ्या वेळेशी आणि मी त्यांच्या वेळांशी जुळवून घेत काम करत असल्याचे तिने सांगितले.
‘हॅप्पी न्यू इअर’मध्ये शाहरूख, दीपिका, अभिषेक बच्चन, सोनू सूद असा मोठा ताफा आहे. या सगळ्यांना सेटवर एकत्र जमवत मोट बांधायची हेच दिग्दर्शकासाठी मोठं काम आहे. मात्र, चित्रपटाविषयी फारसे न बोलण्यासाठी इच्छुक नसणारी फराह मी यांनाच काय, घरीही माझ्या तीन मुलांना सांभाळते आहे, हे विसरू नका..असे सांगत एकाचवेळी आपण घर, चित्रपट आणि टीव्ही अशा जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत असल्याची जाणीवही तिने करून दिली.
‘एन्टरटेन्मेट के लिए कुछ भी करेगा’ सारख्या शोमध्ये जेव्हा क ोणी अगदीच जीवावरच्या कसरती करत असतं तेव्हा माणूस म्हणून काळजाचा ठोका चुकतोच, असे ती सांगते. पण, आता त्या गोष्टींची सवय झाली आहे. मात्र, या शोमधील असा विचित्र प्रकारांपेक्षाही एक भयानक गोष्ट आहे ज्याच्यापासून आपली आजवर सुटका झालेली नाही ती म्हणजे अन्नू मलिक यांची शेरोशायरी. असे ती गंमतीने सांगते. अन्नू मलिक यांच्या शायरीसाठी भयंकर गोष्ट असू शकत नाही, असे फराहचे म्हणणे आहे. मात्र, या शोमधील काही कसरतींचा वापर आपल्या ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटातही केला असल्याचे फराहने सांगितले. आता चित्रिकरण शेवटच्या टप्प्यात असल्याने गडबडीत असलेल्या फराहला या शोच्या काही भागांचे चित्रिकरण करता येणे शक्य नाही आहे. त्या भागांपुरते तिच्या जागी अर्चना पूरणसिंह परीक्षक म्हणून काम पाहणार आहे. मात्र, हा शो माझ्यासाठी फार महत्वाचा आहे त्यामुळे चित्रपटाचे काम पूर्ण होताच पुन्हा शोमध्ये परतरणार असल्याचे फराहने स्पष्ट केले.