श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीतर्फे अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या जीवनावरील ‘हम गया नही जिंदा है’ या महानाटय़ाचे प्रयोग २८ आणि २९ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आले आहेत. महानाटय़ाचे लेखन, संयोजन, गीत, संगीत आणि दिग्दर्शन दास दिगंबर यांचे असून महानाटय़ात ते स्वत: स्वामी समर्थाची भूमिका साकारणार आहेत. २ हजार ४०० चौरस फुटांचा रंगमंच आणि १२५ कलाकारांचा सहभाग हे या महानाटय़ाचे वैशिष्टय़ आहे. माहीम बस आगाराच्या बाजूला असलेल्या मच्छिमार वसाहतीजवळील मृदुंगाचार्य नारायण कोळी मैदानात संध्याकाळी सव्वासहा वाजता हे महानाटय़ रंगणार आहे. या संगीत महानाटय़ात गोंधळ, पालखी, वासुदेव, जोगवा, कव्वाली, पोवाडा, खेळे, जाखडी नृत्य असून काही तांत्रिक करामतीची दृश्येही असल्याचे श्री गोपीनाथ सावकार विश्वस्त निधीचे सुभाष सराफ यांनी सांगितले. तर स्वामी समर्थ यांच्या विचारांचा आणि स्वामी नामाचा प्रसार करणे हा या महानाटय़ाचा उद्देश असल्याचे दास दिगंबर यांनी सांगितले. हे महानाटय़ तीन तासांचे असून त्याला दोन मध्यंतर असल्याचे श्रीयांश कानविंदे यांनी सांगितले.