ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा आज वाढदिवस आहे. डॉ. मोहन आगाशे यांचा जन्म २३ जुलै १९४७ साली झाला. व्यवसायाने मानसोपचारतज्ज्ञ असलेले मोहन आगाशे यांनी अभिनयाची आवड असल्यामुळे नाटकांत काम करण्यास सुरुवात केली. नाटक केल्यानंतर त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि बंगाली चित्रपटात काम केले. एप्रिल, इ.स. १९९७ ते एप्रिल, इ.स. २००२ या कालखंडात ते एफ.टी.आय.आय. या संस्थेचे सर्वसाधारण संचालक होते. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकापासून सुरू झालेला डॉ. मोहन आगाशे यांचा रंगभूमीवरचा प्रवास, अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमधील विविध भूमिका तसेच टीव्हीवरील मराठी-हिंदी मालिकांमध्ये काम करून रसिकप्रिय अभिनेते म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे. जैत रे जैत, सिंहासन, आक्रोश, गंगाजल, त्रिमुर्ती, अब तक छप्पन, असंभव, अपहरण, काय द्यायचं बोला, वळू, देऊळ, अब तक छप्पन २, देऊळ बंद, वेलकम झिंदगी, अस्तु या चित्रपटांत आणि घाशीराम कोतवाल यांसारख्या नाटकांत डॉ. मोहन आगाशे यांनी काम केले आहे. तसेच, एका लग्नाची तिसरी गोष्ट, अग्निहोत्र, गुंतता ह्रदय या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. इ.स. १९९६ साली नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरविले. भारतीय मनोरंजनसृष्टीमध्ये उत्तम कामगिरी बजावल्यामुळे डॉ. मोहन आगाशे यांना भारत सरकारकडून १९९६ साली ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘अस्तु’ चित्रपटातील भूमिकेसाठी यंदाचा श्रेष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याबद्दल मोहन आगाशे यांचा सत्कार करण्यात आला होता.