‘हिरो’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून सूरज पांचोली अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. जिया खानचा प्रियकर असलेला सूरज तिच्या आत्महत्येमुळे चर्चेत आला होता. ‘आमीर बाप की बिगडी औलाद’ म्हणून समाजमाध्यमांतून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. येत्या ११ सप्टेंबर रोजी येणा-या ‘हिरो’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका असलेल्या सूरजने चित्रपट आणि त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलताना आपण निर्दोष असल्याचे सांगितले. सलमान खानने दिलेल्या संधीमुळे आयुष्याला वेगळे वळण मिळाल्याचेही तो म्हणाला. ‘हिरो’च्या निमित्ताने सूरजने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ सोबत दिलखुलास गप्पा मारल्या.
प्रश्नः बॉलिवूडमधील ‘बजरंगी भाईजान’ तुला अभिनेता म्हणून संधी देतोय. सलमान खान आणि तुझ्यातल्या संबंधाबंद्दल काय सांगशील?
सूरज : या नात्याबद्दल बोलायचं झालं तर मी सलमान खान यांना भाई म्हणून बोलवू शकलो असतो, पण मी त्यांना सर म्हणूनच हाक मारतो. आमच्यातील नात्याबद्दल शब्दात सांगणे कठीण आहे.
प्रश्न : सलमान आणि तुझी पहिली भेट कुठे झाली?
सूरज : तुर्कस्थानमध्ये ‘एक था टायगर’च्या चित्रिकरणादरम्यान मी दिग्दर्शक कबीर खान यांना भेटायला गेलो होतो. तिथे सलमान सर मला आदित्य पांचोलीचा मुलगा म्हणून ओळखत होते. त्यांनी मला इथे काय करतोस म्हणून विचारले असता, मी कबीर खान यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम मागायला आल्याचे सांगितले.
प्रश्न : त्या भेटी दरम्यान तुला संधी देण्याविषयी काही बोलणे झाले होते का?
सूरज : सलमान खान मला संधी देतील, असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.
प्रश्न : मग हिरो चित्रपटात तुला संधी कशी मिळाली ?
सूरज : तुर्कस्थानमध्ये ‘एक था टायगर’च्या चित्रिकरणादरम्यान ९ नोव्हेंबर रोजी माझा वाढदिवस होता. त्या आधीच्या रात्री मी लवकर झोपण्याच्या तयारीत होतो. मी झोपेत असताना सलमान सरांनी मला उचलून त्यांच्या रूममध्ये नेले व रात्री तीन वाजता मला उठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चित्रपटाची भेट म्हणून त्यांच्या आगामी चित्रपटात काम कऱण्याबद्दल विचारले. त्याचवेळी मी त्यांना होकार कळवला. त्यानंतर दीड वर्षांनी त्यांनी मला फोन करून सांगितले की, मी हिरो चित्रपटाचा रिमेक बनवत आहे, तुला काम करायला आवडेल का आणि मी होकार दिला. अशा पद्धतीने ‘हिरो’ मला मिळाला.
प्रश्न : सलमानने संधी दिल्यावर तुला दडपण आले का?
सूरज : हो माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवल्याने मला खूपच दडपण आले होते. पण, सलमान सर निर्धास्त होते. त्यांना एखादी गोष्ट विचारायला गेलो असता, त्यांनी निश्चिंत राहून दैनंदिन जीवनात जसा वागतो तसाच चित्रिकरणादरम्यान वागण्याचा सल्ला दिला.