गेल्या दोन महिन्यांमध्ये मराठीतील जवळपास सगळ्याच मनोरंजन वाहिन्यांनी आपलं रुपडं बदलण्याचा ध्यास घेतल्यागत सगळ्या जुन्या मालिका संपवून नव्याकोऱ्या मालिकांचा रतीब सुरू केला. एकमेकांशी असलेल्या स्पर्धेतून अधिक टीआरपी मिळवण्यासाठी या नव्या मालिका सुरू करण्यात आल्या आहेत की ठरावीक एका काळात नव्या मालिका सुरू करण्याचं काही गणित असतं हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न…
दिग्दर्शक केदार शिंदे यांची ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या कार्यक्रम प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक नवनवीन मालिका वाहिनीवर आल्या. २७ एप्रिलपासून ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने या तिकडीचा विनोदी कार्यक्रम सुरू झाला. ‘चला हवा येऊ द्या’ बंद होत नाही तोवर हा कार्यक्रम सुरू झाला. गेल्याच आठवड्यात ‘अबीर गुलाल’ ही नवीन मालिका वाहिनीवर सुरू झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार आणि पायल जाधव मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय, लग्नाची आवड असलेल्या आणि लग्नानंतरच्या सुंदर आयुष्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलीची गोष्ट असलेली ‘अंतरपाट’ ही मालिका १० जूनपासून सुरू होणार आहे. अभिनेत्री रश्मी अनपट व अभिनेता अशोक ढगे यात प्रमुख भूमिकेत आहेत. ‘अंतरपाट’ मालिका कन्नड मालिकेचा रिमेक आहे. आणि आता ‘मराठी बिग बॉस – ३’चं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार असल्याची घोषणा करत वाहिनीने आणखी एक सुखद धक्का दिला आहे. या सगळ्या नव्या बदलांविषयी बोलताना, ६ महिन्यांपूर्वी आपण ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या कार्यक्रम प्रमुखपदाचा कार्यभार घेतल्यानंतर ‘इंद्रायणी’ पासून ते ‘मराठी बिग बॉस’पर्यंत नव्या मालिकांची सुरुवात केल्याचं केदार शिंदे यांनी सांगितलं. कोणाला तरी खाली पाडण्यापेक्षा वा कोणाशी स्पर्धा करण्यापेक्षा मनापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा >>>ऐश्वर्या नारकर पन्नाशीच्या नसून ‘इतकं’ आहे वय, जन्मतारीखच सांगितली; कोकणातलं गाव कुठलं अन् कुठे राहतात? जाणून घ्या
सोनी मराठी वाहिनीवरही नव्या मालिकांचा धडाका सुरू आहे. शनिदेव यांच्यावर आधारित ‘जय जय शनिदेव’ ही मालिका ८ मे पासून प्रसारित झाली आहे. या मालिकेत अभिनेता संकेत खेडकर हा शनिदेवाची भूमिका साकारतो आहे. शेतकरी कुटुंबातील कन्येची कथा सांगणारी ‘भूमिकन्या साद घालते निसर्गराजा’ ही मालिका १० जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे व अभिनेता आनंद अलकुंटे, गौरव घाटणेकर या मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार असून अभिनेत्री श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. शिवाय, पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दोन वेगळ्या काळातील व्यक्तींची कथा रंगवणारी ‘तू भेटशी नव्याने’ ही वाहिनीची नवी मालिकाही प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री शिवानी सोनार या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. ‘सोनी मराठी वाहिनी अन्य वाहिन्यांपेक्षा वयाने तरुण आहे. इतर वाहिन्यांना २० वर्षे किंवा त्याहीपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यामुळे आम्ही सतत नवीन विषय शोधून ते प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. उन्हाळ्याची सुट्टी संपून नेहमीचा दिनक्रम सुरू झाला आहे. त्यादृष्टीने आम्ही या तीन नवीन मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला’ असं सोनी मराठी वाहिनीचे व्यवसाय प्रमुख अजय भालवणकर यांनी सांगितलं.
तर लागोपाठ नवीन मालिका सुरू करण्यात अग्रेसर असलेल्या ‘झी मराठी’ वाहिनीच्या या नव्या प्रयोगांबद्दल बोलताना, आयपीएल सामन्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना चढलेला क्रिकेटज्वर शांत झाल्याने ते आता पुन्हा मनोरंजनासाठी मालिकांकडे वळले आहेत. त्यामुळे आत्ताच्या लोकप्रिय मालिकांमधून सतत काही तरी नवीन घटना दाखवत राहण्याबरोबरच ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका आणि ‘ड्रामा ज्युनिअर’सारखा रिअॅलिटी शो सुरू करत असल्याची माहिती वाहिनीच्या प्रमुख व्ही. आर. हेमा यांनी दिली. टीआरपीची गणितं लक्षात घेता कुठलीही मालिका अधिक ताणण्यापेक्षा नवं काही दाखवण्यावर अधिक भर दिला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
टीआरपीच्या गणितात वरचढ असलेली ‘स्टार प्रवाह’ वाहिनीही नव्या मालिकांच्या बाबतीत मागे नाही. ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘साधी माणसं’ आणि ‘येड लागलं प्रेमाचं’ अशा तीन नवीन मालिका वाहिनीवर सुरू आहेत. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत विशाल निकम व जय दुधाणे हे दोन कलाकार एकत्र आले आहेत. लवकरच ‘थोडं तुझं थोडं माझं’ ही मालिका १७ जूनपासून वाहिनीवर दाखल होणार असून यात अभिनेत्री शिवानी सुर्वे, मानसी कुलकर्णी, अभिनेता समीर परांजपे असे लोकप्रिय कलाकार काम करत आहेत. या नव्या बदलांबद्दल वाहिनीचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘टीव्ही हा कुटुंबातील सदस्यासारखा असतो, त्यामुळे त्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणं अधिक आव्हानात्मक असतं. म्हणून सतत नावीन्यपूर्ण आशय प्रेक्षकांसमोर सादर करणं ही आमची जबाबदारी वाढते. प्रेक्षकांना आवडेल अशी सशक्त कथा असली तर प्रतिसाद मिळतोच, त्यामुळे आम्ही अन्य कोणत्या वाहिनीशी तुलना न करता पूर्वीपेक्षा अधिक उत्तम आशय देण्याचा प्रयत्न करत आहोत’.