रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठ महिने करोना आणि टाळेबंदीमुळे थांबलेला चित्रपट उद्योग आता एका वेगाने पुढे पुढे धावतो आहे. गेल्या महिन्यात ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट पहिल्यांदा चित्रपटगृहातून प्रदर्शित झाला, त्यानंतर या महिन्यात ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित ‘टेनेट’ हा हॉलीवूडपटही भारतात प्रदर्शित झाला आणि आता पुन्हा एकदा ‘इंदु की जवानी’ हा हिंदी चित्रपट मोठय़ा प्रमाणावर चित्रपटगृहातून प्रदर्शित झाला आहे. हिंदीतील अनेक छोटे-मोठे चित्रपट अजूनही प्रदर्शनासाठी ओटीटीचाच मार्ग धरत असताना कियारा अडवाणीची मुख्य भूमिका असलेला ‘इंदु की जवानी’ हा चित्रपट चित्रपटगृहातूनच प्रदर्शित करण्यात आला आहे. एकाअर्थी करोनाचा धोका असतानाही टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर चित्रपटाची व्यवस्थित पूर्वप्रसिद्धी करून, देश आणि परदेशातील चित्रपटगृहात मोठय़ा प्रमाणावर प्रदर्शित होणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे असे म्हणता येईल. चित्रपटगृहात ‘इंदु की जवानी’ हा चित्रपट आहे, तर ओटीटीवर ‘दुर्गामती’ आहे, करोनाकाळात खऱ्या अर्थाने नायिका किल्ला लढवतायेत, असे सांगत ‘इंदु की जवानी’च्या निर्मात्या मोनिषा अडवाणी आपला आनंद व्यक्त करतात.

आठ महिने चित्रपटगृहे बंद होती आणि इतक्या दिवसांनंतर एखादा चित्रपट लोकांसमोर येणार असेल तर तो एखाद्या मोठय़ा अभिनेत्याचाच चित्रपट असला पाहिजे, असा हट्ट आता कोणी धरताना दिसत नाही आहे. एरव्ही कियारा अडवाणी मुख्य भूमिके त असलेला ‘इंदु की जवानी’ हा चित्रपट लोकांना चित्रपटगृहात खेचून आणणारा चित्रपट आहे, असा विचार के ला गेला नसता. मात्र या परिस्थितीत अभिनेत्रींनी आपले चित्रपट आपल्या खांद्यावर तोलून धरले आहेत आणि त्या नेतृत्व करताना दिसत आहेत, हे खूप सकारात्मक चित्र असल्याचे मोनिषा सांगतात. कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी के ल्यानंतर दहा वर्षांपूर्वी निर्माती म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या मोनिषा यांनी आत्तापर्यंत ‘एअरलिफ्ट’, ‘सत्यमेव जयते’, ‘बाटला हाऊस’सारखे यशस्वी चित्रपट दिले आहेत. तरीही करोनाचा धोका अजून टळलेला नसताना ‘इंदु की जवानी’सारखा चित्रपट त्यांनी चित्रपटगृहातून तेही पन्नास टक्के  क्षमतेत चालवण्याची अट असताना प्रदर्शित करण्याचा धोका का पत्करला? या प्रश्नाला उत्तर देताना काही चित्रपट हे आपण फक्त व्यावसायिक गणितं लक्षात घेऊन करत असतो तर काही चित्रपट हे मनापासून करतो. ‘इंदु की जवानी’ची कथा ऐकल्यानंतर तो आपण करावाच, असा विचार मनात आला होता. आणि हीच स्थिती कियाराला पटकथा ऐकवल्यानंतर तिचीही झाली होती. तिनेही कथा ऐकल्या ऐकल्या हा चित्रपट तीच करणार, असे सांगून टाकले. ‘बधाई हो’, ‘क्वीन’, ‘तनू वेड्स मनू’सारख्या चित्रपटांप्रमाणेच ‘इंदु की जवानी’ हा हलकाफु लका, एखादा विषय घेऊन निखळ मनोरंजनात्मक पद्धतीने मांडलेला चित्रपट आहे. या चित्रपटांना लोकांकडून फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे अशा शैलीचा चित्रपट लोकांना चित्रपटगृहातूनच पाहायला मिळायला हवा, यावर आम्ही ठाम होतो, असं त्या सांगतात. दुसरी गोष्ट, गेली कित्येक वर्षे चित्रपटगृहांनी आमची साथ दिलेली आहे. त्यामुळे या अवघड काळात त्यांना सोडून दुसऱ्या माध्यमाकडे जाण्यापेक्षा थोडं थांबून त्यांच्याबरोबरच पुढे जाणं आम्हाला योग्य वाटलं, असं त्या सांगतात.

मोनिषा या आपला भाऊ प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता निखिल अडवाणी यांच्यामुळे चित्रपटनिर्मिती क्षेत्रात उतरल्या. त्याबद्दलचा किस्सा त्या आवर्जून सांगतात. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला कु ठल्या ना कु ठल्या पद्धतीचं आमिष दाखवून काम करून घेतो. निखिल आणि मी लहानपणी आम्ही खूप भांडायचो. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो चित्रपट क्षेत्रात शिरला, तिथे स्थिरावला. तर मी कॉर्पोरेत विश्वात कार्यरत होते. आता खूप झालं कॉर्पोरेट क्षेत्रातील काम, तू माझ्याबरोबर चित्रपट निर्मिती क्षेत्रात ये.. आपल्याला जगभर खूप भटकायला मिळेल, असं आश्वासन निखिलने मला दिलं होतं. आज दहा वर्षांत आम्ही इतके  चित्रपट के ले, पण मी अजून इथेच काम करते आहे, कु ठेही भटकायला गेलेले नाही, असं त्या गमतीने सांगतात. पण चित्रपटनिर्मितीचा अनुभव खूपच वेगळा आहे. इथे खर्चाचा एवढा भार सांभाळणं, प्रत्येक चित्रपटामागे एके क टीम सांभाळणं हे खूप आव्हानात्मक आहे, असं त्या सांगतात. विशेषत: आताच्या काळात निर्मात्यांसमोरचं आव्हान खूप वाढलं आहे, असं त्यांनी सांगितलं. आमच्या टीम वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण करतायेत. ‘इंदु की जवानी’ पूर्ण करून तो आम्ही प्रदर्शित के ला. ‘सत्यमेव जयते २’चं र्अध चित्रीकरण पूर्ण झालं आहे. अर्जुन कपूर-रकु ल प्रीत यांच्याही चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होत आलं आहे. एक वेबमालिका प्रदर्शनाच्या मार्गावर आहे, हे सगळं करत असताना टीममधल्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप जिकिरीचं झालं आहे. प्रत्येक जण जीव धोक्यात घालूनच सेटवर काम  करतो आहे. सगळ्या प्रकारची काळजी घेतली जाते. चेहऱ्यावर मुखपट्टी, दर दहा-पंधरा मिनिटांनी हात धुणं, तपासणी या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळल्या जातात. अजूनपर्यंत कोणत्याही टीमला काही झालेलं नाही, हे आमचं भाग्य आहे, तरीही सतत काळजीची टांगती तलवार ही सध्या निर्मात्यांवर असते असं त्यांनी सांगितलं.

मोनिषा यांनी सातत्याने नवोदित दिग्दर्शकांबरोबर काम के लं आहे. नवनवीन दिग्दर्शक, त्यांची वेगळी विचारसरणी आणि कथाविषय घेऊन येतात. निर्माता म्हणून या दिग्दर्शकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे, असं त्या सांगतात. ‘इंदु की जवानी’चा दिग्दर्शक अबीर सेनगुप्ताचा दिग्दर्शक  म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. ‘सत्यमेव जयते २’चा दिग्दर्शक मिलाप झवेरी हाही तुलनेने नवीनच आहे आणि अर्जुन कपूरच्या चित्रपटाची दिग्दर्शिका काश्वी नायर हिचाही पहिलाच चित्रपट आहे, असं त्या सांगतात. चित्रपटात नावाजलेले कलाकार आहेत का, दिग्दर्शक नावाजलेला आहे का, कमाई किती करेल याहीपेक्षा चित्रपटाची कथा लोकांना भिडणारी आहे का? त्यांना पडद्यावर ती पहायला आवडेल का? हे आपल्याला महत्त्वाचे वाटते. निर्माता म्हणून सातत्याने चांगल्या कथांच्या शोधात राहणं आणि अशा कथांना पडद्यावर आणण्यासाठी धडपडणं हे निर्मात्याचं काम आहे. हे काम आपण यापुढेही मनापासून करत राहू, असं त्या सांगतात.

 

x

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monisha advani indoo ki jawani kiara advani zws
First published on: 13-12-2020 at 03:01 IST