हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ ज्या पाश्र्वगायकांनी गाजविला त्यात मोहम्मद रफी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पहाडी आणि मधाळ आवाजाच्या या गायकाला काळाच्या पडद्याआड जाऊन ३१ जुलैला ३३ वर्षे होतील. मात्र रसिकमनावर आजही त्यांच्या स्वराचे गारूड आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी २६ ते ३१ जुलैदरम्यान ‘लोकसत्ता’ प्रस्तुत ‘फिर रफी’ या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये २६ जुलै रोजी प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली, २७ जुलै- रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी, २८ जुलै- सावित्रीबाई फुले नाटय़गृह, डोंबिवली, २९ जुलै- भाईदास हॉल, विलेपार्ले, ३० जुलै गडकरी रंगायतन, ठाणे आणि ३१ जुलै यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा येथे हे कार्यक्रम (सर्व रात्री साडेआठ वाजता) होणार आहेत. रफी यांच्या आवाजाची आठवण करून देणारी गाणी श्रीकांत नारायण तसेच सरिता राजेश सादर करणार आहेत. संदीप कोकीळ आणि संदीप पंचवाटकर हे निवेदन, तर आनंद सहस्रबुद्धे संगीत संयोजन करणार आहे.
जीवनगाणी संस्थेच्या प्रसाद महाडकर यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ‘लोकसत्ता’तर्फे प्रस्तुत होत असलेल्या या कार्यक्रमांमुळे चित्रपटगीतांच्या सुवर्णकाळाला उजाळा मिळणार  आहे.