भारताला विश्वसुंदरीपदाची चटक लागल्यासारखे सुश्मिता सेन, ऐश्वर्या राय यानंतर काही वर्षे भारतीय ललनांनी विश्वसौंदर्याच्या व्यासपीठाला काबीज केले. मात्र गेली १२ वर्षे भारताला दूर ठेवलेला हा किताब मिळवून आणण्याचा निर्धार यंदाची मिस इंडिया विजेती नवनीत कौर धिल्लन हिने केला आहे.
६२ व्या मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणे हे माझे ध्येय असून, गेल्या बारा वर्षांचा दुष्काळ यंदा संपवणार असल्याचे प्रतिपादन तिने सोमवारी केले. या मादक सौंदर्यवतीने या स्पर्धेच्या तयारीत व्यत्यय येऊ नये, यासाठी दोन चित्रपटांच्या ‘ऑफर्स’ धुडकावून लावल्या आहेत. मिस इंडिया झाल्यानंतर चित्रपटांसाठी तसेच मॉडलिंगसाठी मागणी या गोष्टींचा विचार केवळ किताब आणल्यानंतरच करीन, असे नवनीतचे म्हणणे आहे. सध्या पंजाब विद्यापीठात सुरू असलेला अभ्यासक्रम माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, अभिनय आणि इतर गोष्टी त्यानंतर कधीही करता येण्यासारख्या आहेत, असे तिचे म्हणणे आहे. चित्रपट धुडकावून मिस युनिव्हर्स स्पर्धेची तयारी करणाऱ्या नवनीत कौरचे स्वप्न पूर्ण होते की नाही, हे लवकरच उलगडणार आहे.