अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर कलाविश्वात एक पोकळी निर्माण झाली. आजच्या घडीला त्यांच्या निधनानंतर बरेच दिवस उलटले असले तरीही कुटुंबात त्यांची कमतरता नेहमीच सलते आहे. खुद्द बोनी कपूर, मुलगी जान्हवी आणि खुशी कपूर यांनीही अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट स्पष्ट केली. श्रीदेवी यांचं निधन अनेकांसाठी एक धक्का होता. एक असा धक्का जो कित्येकांना पचवता आला नाही. मुळात बोनी कपूर यांच्यावर मोठा आघातच झाला होता. अचानकच आपल्या आयुष्यभराच्या साथीदाराची एक्झिट त्यांना ‘सदमा’ देऊन गेली.
श्रीदेवी या बोनी कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. यापूर्वी मौना शौरी यांच्यासोबत बोनी यांनी लग्न केलं होतं. १९९६ मध्ये त्यांच्या नात्याला तडा गेला होता. ज्यानंतर २०१२ मध्ये कॅन्सरमुळे मोना यांचं निधन झालं. त्यांचं निधनही बोनी कपूर आणि त्यांच्या मुलांसाठी म्हणजेच अंशुला आणि अर्जुन कपूरसाठी एक आघात होता. आयुष्यात अशा जवळच्या व्यक्तींचं निघून जाणं खरंतर बऱ्याच प्रमाणात एखाद्याला पुरतं बदलून टाकतं. पण, बोनी मात्र या परिस्थितीतही ठामपणे उभे राहिले.
‘स्पॉटबॉय ई’ला दिेलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘कोणताही आघात सहन करण्याची माझी ताकद तुलनेने जास्त चांगली आहे. मग ते शारीरिकदृष्ट्या असो किंवा भावनिकरित्या. मी खोटं नाही सांगत, पण वेळप्रसंगी मीसुद्धा पूर्णपणे तुटतो, परिस्थितीपुढे हतबल होतो . पण, नंतर पुढचे निर्णय घेण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा स्वत:ला सावरतो.’
सध्याच्या घडीला आपल्यापुढे कोणतंही संकट आलं तर त्यासाठी आपण तयार असल्याचंही ते म्हणाले. ‘आता कोणत्याही संकटासाठी मी तयार आहे. मुळात मला कशाचीही भीती वाटत नाही. आयुष्यात येणाऱ्या नकारात्मक आणि अनपेक्षित वळणांसाठी मी पूर्णपणे तयार आहे’, असं त्यांनी स्पष्ट केलं.