ज्या काळात स्त्रियांसमोर बालविवाह आणि त्यातून येणाऱ्या समस्या होत्या. शिक्षणासारख्या मूलभूत हक्कांपासून समाजाने त्यांना दूर ठेवले होते, त्या काळात ज्या माणसाबरोबर आपला बालविवाह झाला त्याला पती म्हणून स्वीकारण्याचे नाकारणाऱ्या, त्यासाठी कोर्टाची पायरी चढून कायदेशीर लढाई जिंकणाऱ्या आणि सगळ्या प्रतिकूलतेवर मात करून डॉक्टरी शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या डॉ. रखमाबाई यांचा जीवनपट पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. ‘सिंधुताई सपकाळ’ आणि ‘गौरी हर की दास्ताँ’सारख्या चरित्रपटानंतर दिग्दर्शक अनंत महादेवन पुन्हा एकदा डॉ. रखमाबाई यांच्या चरित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पाच्र्ड’ या चित्रपटातून लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीने या चित्रपटात डॉ. रखमाबाईची भूमिका साकारली आहे. मराठीतला हा तिचा पहिलाच चित्रपट ठरला आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनेक महिला असतील पण त्या काळी परदेशात जाऊन पदवी घेऊन इथे परतल्यानंतर डॉक्टर म्हणून आपला व्यवसाय सुरू करणाऱ्या रखमाबाई पहिल्या होत्या. आजही जिथे अनेक उच्चविद्याविभूषित तरुणी विवाहानंतर आपले करिअर बंद करून घरसंसारात व्यग्र होतात. त्यांच्यासाठी १८६४ ते १९५५ च्या काळात डॉ. रखमाबाईंनी कोणाचाही पाठिंबा नसताना आपला व्यवसाय सुरू केला आणि एक्क्याण्णव वर्ष त्या जगल्या..त्यातही ९० व्या वर्षीही त्या नियमित त्यांच्या रुग्णालयात जात होत्या, ही फोर प्रेरणादायी गोष्ट आहे, असे मत तनिष्ठाने ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना व्यक्त केले. ‘देख इंडियन सर्कस’, ब्रेट लीबरोबरचा ‘अनइंडियन’, ‘पाच्र्ड’ अशा वेगळ्या विषयांवरचे चित्रपट करणाऱ्या तनिष्ठाने डॉ. रखमाबाईंवरचा चित्रपट हे आपल्यासाठी मोठे आव्हान होते, असे सांगितले. डॉ. रखमाबाईंवरचा हा चित्रपट मराठी आहे. माझा जन्म पुण्याचा असला तरी मराठी भाषेशी तितका संबंध आलेला नाही. शिवाय, या चित्रपटात रखमाबाईंचे लहानपण, त्यानंतर वयाच्या विशीपासून मग तीस ते चाळीस, पन्नास ते नव्वदाव्या वर्षांपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवरचा त्यांचा प्रवास दाखवला गेला आहे. त्या त्या टप्प्यावर त्यांची भाषाही कमालीची बदलत गेली आहे. म्हणजे सुरुवातीची त्यांची शुद्ध मराठी, परदेशात शिक्षण घेऊन आल्यानंतरचा त्यांचा विश्वास आणि इंग्रजी-हिंदीबरोबरची पुढारलेली मराठी भाषा असे खूप तपशीलवार काम करावे लागले. त्यामुळे भाषेचा सराव खूप करावा लागला, असे तिने सांगितले.
एखाद्याच्या वर्णावर बोट ठेवणे हा विनोद असू शकत नाही
‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी गेलेल्या तनिष्ठाने तिच्या वर्णावरून तिच्यावर जी विनोदी शेरेबाजी केली गेली त्याला जाहीरपणे नापसंती दर्शवली. तनिष्ठाच्या या भूमिकेनंतर विनोदाला इतक्या गंभीरपणे घेऊन तिने प्रसिद्धीसाठी हा खटाटोप केल्याची टीका तिच्यावर करण्यात आली.एखाद्या घटनेवर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया यायला हव्यात. माझी प्रतिक्रिया मी जाहीरपणे व्यक्त केली. मुळात, उत्तम विनोद करण्यासाठी तेवढीच कुशाग्र बुद्धिमत्ताही हवी असते. केवळ कोणाच्या तरी वर्णावरून, व्यंगावरून केलेल्या शेरेबाजीत तुम्हाला हसण्यासारखी गंमत काय वाटते? अशा तथाकथित विनोदासाठी हुश्शारीचीही गरज लागत नाही. त्यामुळे मुळात या मंडळींना विनोद काय असतो, ज्या ‘रोस्ट’ या अमेरिकन प्रकाराबद्दल ते बोलतात त्याचे स्वरूप काय इत्यादी मूलभूत गोष्टी शिकून घेणे गरजेचे आहे. या सगळ्या प्रकरणावर मी सविस्तर प्रतिक्रिया देणार आहे, असे तिने सांगितले.