विवेकपूर्वक आपले क्रियाकलाप बदलून शुद्ध जी क्रिया आहे तीच आपल्याकडून घडावी, असा अभ्यास साधकानं प्रयत्नपूर्वक करावा, हीच समर्थाची इच्छा आहे. साधकालाही ‘आपण चांगलं वागावं,’ अशी प्रामाणिक इच्छा असते. पण ते साधत नसतं. मग माणसाच्या स्वाभाविक सवयीनुसार तो चांगलं बोलतो, आपण चांगलं असल्याचं भासवतो, प्रत्यक्षात त्याच्या मनाची चाल त्या बोलण्याला अनुरूप नसते. यातून एक विचित्र आंतरिक संघर्ष उद्भवतो. मनात तर ‘वाईट’ विचार उद्भवत आहेत, पण तोंडानं चांगलं बोललं जात आहे! म्हणून समर्थ म्हणतात, ‘जनीं बोलण्यासारिखें चाल बापा। मना कल्पना सोिड संसारतापा॥’ मागेच आपण पाहिलं होतं की ‘जनी’ म्हणजे ‘संतजनी’. अर्थात सत्पुरुषांच्या सहवासात तू जे जे ऐकतोस आणि त्यावर होकार भरतोस ते कृतीतही येईल, इकडे लक्ष दे. बरं सत्पुरुष साधकाची तयारी, पायरी आणि आवाका लक्षात घेऊनच बोध सांगत असतो. जे सांगतो ते प्रत्यक्ष जगूनही दाखवत असतो. त्यातलं फार थोडं आणि तेही हळूहळू आपण आचरणात आणू शकू, हेदेखील तो गृहीत धरीत असतो. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना? की, ‘तुम्ही एक पाऊल टाका, मी दहा पावलं तुमच्याकडे चालत येईन!’ इतकी माफक अपेक्षा असते. तेव्हा मी काय दहाच्या दहा पावलं टाकीन, असं तोंडानं जर म्हणत असू, तर निदान एक पाऊल तरी टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. तसं न करता, बोधानुसार एकही पाऊल न टाकता जर दहा पावलं प्रपंच ओढीनं जगाकडेच टाकली जात असतील, तर काय घडेल? समर्थ सांगतात, मन पुन्हा कल्पनेच्या जाळ्यात अडकेल आणि त्यानं पुन्हा आसक्तीचाच संसार मांडला जाईल आणि त्यानं वाटय़ाला तापच येईल. त्यामुळे बोलणं आणि चालणं यात जर एकवाक्यता नसेल तर पाखंडात मन अडकेल आणि त्यानं ध्येयशिखराच्या पायथ्यापर्यंतही पोहोचता येणार नाही. बोल आणि चाल यात एकरसता नसेल, तर जगण्याचा सूरही बिघडेल. यानंतर ‘मनोबोधा’च्या पुढील श्लोकात सत्पुरुष किंवा सद्ग्रंथ या सत्संगाच्या आधारावर जो साधक अध्यात्माच्या वाटेवर पहिली पावलं टाकू पाहात आहे, त्याच्यासाठी समर्थ एक प्राथमिक कार्यक्रम आखून देत आहेत. हा १०६ वा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे. बरी स्नानसंध्या करीं येकनिष्ठा। विवेकें मना आवरीं स्थानभ्रष्टा। दया सर्व भूतीं जया मानवाला। सदा प्रेमळू भक्तिभावें निवाला॥ १०६॥ प्रचलित अर्थ : एकनिष्ठेने स्नानसंध्यादि स्वधर्मकम्रे कर आणि भगवंतापासून दुरावलेल्या स्थानभ्रष्ट झालेल्या मनाला आवर घाल. सर्व भूतमात्रांकडे जो दयाभावाने पाहतो तोच प्रेमळ भक्त भक्तिभावाच्या योगे सदा समाधान प्राप्त करून घेतो. आता मननार्थाकडे वळू. इथं ‘स्नानसंध्या’ असं म्हटलं आहे त्याचा अर्थ काय? पूर्वीच्या काळी मुंज हा असा पहिला विधी असे ज्यात मुलाला गुरुगृही अध्ययनाचा अधिकार आणि त्याला जोड म्हणून संध्या हा स्वाध्याय लाभत असे. संध्या म्हणजे परमात्म्याचं अंत:करणपूर्वक ध्यान. (सम्यग् ज्ञानं इति संध्या।) यात गायत्री मंत्रासह भगवंताचं स्मरण असे. ज्या स्थानी संध्या केली जात असे त्या स्थानाची प्रथम मंत्रपूर्वक आसन शुद्धी केली जात असे. हेतू हा की ज्या स्थानी भगवंताचं स्मरण साधायचं आहे ती जागाही भ्रष्ट नको. या सर्व गोष्टींचा प्रतीकासारखा चपखल वापर करीत या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणात साधकासाठी मार्मिक मार्गदर्शन समर्थानी केलं आहे. -चैतन्य प्रेम