सद्गुरूंच्या एका वाक्याची प्रकर्षांनं आठवण होते. त्याचा मराठीत आशय असा आहे की, ‘‘न मागता सारं काही मिळतं आणि मागितल्यावर कधी कधी भीकही मिळत नाही!’’ ‘ध्येयसूत्रिका’ या त्यांच्या दोहावलीतला पहिलाच दोहा आहे.. नहीं चाहता था तो मिलता सभी था। अगर चाहते हैं तो मिलता नहीं है।। कहूँ कैसे किससे कि चाहत बुरी है। नहीं चाह कुछ भी तो कुछ दुख नहीं है।। जोवर काही इच्छा नव्हती तोवर सारं काही मिळत होतं आणि इच्छा प्रसवू लागली, तर काहीच मिळत नाही! हा अनुभव येऊनही माणसाला जाग येत नाही.. मग कुणाला कसं सांगू की ही इच्छाच वाईट आहे.. इच्छाच नसली तर कोणतंही दु:ख नसेल! आपल्या अंत:करणातल्या भवभयाचं मूळ ही इच्छाच आहे! आणि या सर्व इच्छा द्वैतमय आहेत म्हणूनच मनातलं द्वंद्व वाढविणाऱ्या आहेत.. अमुक व्हावं ही इच्छा आणि तितकीच तीव्र अमुक होऊ नये, ही इच्छा! अमुक मिळावं ही इच्छा आणि तितकीच तीव्र अमुक मिळू नये, ही इच्छा! या सर्वच इच्छांची पूर्ती या जगातच होणार आहे. त्यामुळेच हे जग, हे भौतिकच भवप्रेम आणि भवभय या दोहोंचं पोषण करणार आहे. आणि भयाचा पगडा मनावर अधिक असतो त्यामुळेच हे भवभय मनाला सदोदित अस्तरासारखं चिकटून आहे. हे भवभय सोडायचं म्हणजे काय? तर योग्य ते, आवश्यक ते सर्व प्रयत्न करायचे, पण त्यातून काय होईल, याची चिंता करीत बसायचं नाही. प्रयत्नांतून जे घडेल ते अयोग्य वाटलं तर पुन्हा प्रयत्न करायचे, पण तरीही काय घडेल, याच्या चिंतेला थारा द्यायचा नाही. थोडक्यात भर कर्तव्यपालनावर, प्रयत्नांवर हवा, फलाशेबाबत तळमळण्यावर नसावा. असं सुरू झालं तर हळूहळू जाणवू लागेल, आपले प्रयत्न हे अटळ असतात, पण ते निमित्तमात्रच असतात. कधी कधी आटोकाट प्रयत्न करूनही यश हुलकावणी देतं, तर कधीकधी वरवरचे प्रयत्न करूनही भरपूर यश पदरात पडतं. थोडक्यात आपले प्रयत्न आणि यश यांचं समीकरण नेहमीच जुळतं असं नाही. त्यामुळे यशाचा आनंद आहेच, पण यशापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक मानला तर प्रयत्नांचं प्रमाण कमी न होता, यशासाठीची तळमळ कमी होणं साधू शकेल. त्यामुळे जगाची, जगातल्या चढउतारांची, जगाच्या प्रभावाची भीती कमी होऊ शकेल. हे घडलं तरच भौतिकाचा मनातला धाक कमी होत जाईल आणि धीर वाढत जाईल. समर्थही म्हणूनच भवाचं भय सोडून द्यायला बजावतात आणि पुढे सांगतात.. धरीं रे मना धीर धाकासि सांडीं। धीर धर आणि धाक सोड.. आपण अगदी उलट करत असतो! आपण धाक मनात घट्ट धरून ठेवतो आणि धीर सोडून देतो! तर हा धाक आहे तो भौतिकाचा आहे. भौतिक गमावण्याचा आहे. भौतिकात घट होण्याचा आहे. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना? की, ‘‘किती मिळालं म्हणजे पुरे, हे माणसाला माहीत नाही त्यामुळे कितीही मिळालं तरी त्याला पुरेसं वाटत नाही!’’ भौतिकाची ही गत आहे. भौतिक गमावण्याची भीती आहे म्हणून भौतिक कितीही वाढवलं तरी ते कमीच वाटतं आणि म्हणून माणूस अहोरात्र भौतिक मिळवण्यात, जोपासण्यातच दंग असतो. हा भौतिकाचा धाक तेव्हाच सुटेल जेव्हा मनात धीर वाढत जाईल आणि इथंच मोठी मेख आहे. समर्थानी एके ठिकाणी म्हटलं आहे, ‘‘धिर्धरा धिर्धरा तकवा। हडबडूं गडबडूं नका।’’ म्हणजे धीर धरा, धीर धरा.. हडबडून जाऊ नका, गडबडून जाऊ नका.. पण मोठा प्रश्न असा की हा धीर कोणत्या आधारावर धरायचा? हा धीर काही स्वबळावर वाढणारा नाही. त्यासाठी असाच आधार पाहिजे जो भौतिकातली माझी अधीरता संपवू शकेल! -चैतन्य प्रेम