आज प्रचितीसाठी घरी सारं काही सरप्राइज असणारं होतं, कारणही तसंच होतं. ती आज आयुष्यात प्रथमच नोकरीचा एक महिना पूर्ण करून पहिला पगार घेऊन घरी येणार होती. तिचे काका, काकू आणि जवळचे नातेवाईक सर्व जण हजर होते सरप्राइज देण्यासाठी. ती घरी येताच सर्वानी एकच कल्ला केला. त्यानंतर मात्र घरातील अनुभवी मंडळींनी या पैशांचं काय करायचं, याचे सल्ले द्यायला सुरुवात केली. फिनान्शिअल मॅनेजमेंट केलेला सन्नाथ समोरच बसला होता. त्याने तर कपाळावरच हात मारला आणि आजी-आजोबा, काका-काकूंना म्हणाला, तुम्ही सर्वानी पण काळाप्रमाणे बदलायला हवंय. आताचे उपाय सांगा, बाबा आदमच्या जमान्यातील नव्हे!

मग सन्नाथनेच सुरुवात केली. तो म्हणाला, निवृत्तीनंतरच्या प्लानिंगला नोकरीच्या पहिल्याच दिवशी सुरुवात होते, हे लक्षात घ्यायला हवं. बदलती समीकरणं ध्यानात ठेवायला हवीत. पूर्वीच गुंतवणुकीचं समीकरण व्याज दर, मुदत ठेवी, कायमस्वरूपी ठेवी, बचतपत्र यावर अवलंबून होतं. आता ते उपाय बादच झालेत. एखाद्याने तसे ठरवले तर काही महिन्यांतच सारी पुंजी संपलेली असेल. आता २००४ सालानंतर सेवेत आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही निवृत्तीचा लाभ नसणार, त्यामुळे नियोजन सर्वानाच करावं लागणार. आज जेवढी गुंतवणुकीची साधनं उपलब्ध आहेत तेवढी पूर्वी नव्हती, हेही लक्षात घेतलं पाहिजे. जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्था यामुळे खूप गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे शब्दप्रयोगही बदलले. आता फायनान्शिअल इंजिनीअिरग असा शब्दप्रयोग वापरला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज लावलं झाड आणि उद्या फळं आली असं होणार नाही. त्यासाठी तेवढा संयमही राखायला हवा.

‘हल्ली त्या म्युच्युअल फंडांच्या जाहिराती खूप लागतात टीव्हीवर’- आजोबा मध्येच म्हणाले. त्यावर सन्नाथ म्हणाला, दोन हजार सालानंतर म्युच्युअल फंडांच्या क्षेत्रात स्पर्धा वाढली. आता तर ते सर्व सेबीच्या अधिकार क्षेत्राखाली आले आहेत. ज्यांनी पंधरा वर्षांपूर्वी ही गुंतवणुकीची कास धरली त्यांना आता फळे मिळताहेत. पूर्वी गुंतवणूकदारांना फिक्स इन्कमची आस होती. आता याच गुंतवणुकीतून चांगला करमुक्त लाभ मिळतोय त्याचा फायदा होतोय हेही लोकांना लक्षात येतेय. काय संज्योत काका? असे म्हणत सन्नाथने काकाकडे मोर्चा वळवला. तो म्हणाला, काकाने म्युच्युअल फंडात सुरुवात केली तेव्हा घरात सर्वानीच त्याला वेडय़ात काढले होते. पण त्याने सारे काही वेळेवर केले. गुंतवणुकीमध्ये नियमितता आणि सातत्य हवं, ते सूत्र पाळलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणुकीचं गणित तुमच्या चलनवाढीच्या दराशी जमावं लागतं. भारतात ६ टक्के चलनवाढ गृहीत धरली जाते. याचाच अर्थ तुमची गुंतवणूक किमान ७ टक्के परतावा देत असेल तरच तुम्ही फायद्यात आहात. चलनवाढीचं हेच गणित घरखर्चालाही लागू असणार, तोही तेवढय़ाच पटीत वाढणार. म्हणजे आज ३० हजार असलेला घरखर्च २० वर्षांनी लाखाच्या घरात असणार. म्हणजेच तेव्हा निवृत्तीनंतरचे आयुष्य असेल तर तेव्हा व्यवस्थित आयुष्य जगण्यासाठी १ कोटी २० लाखांची पुंजी हवी. म्युच्युअल फंड, शेअर बाजाराचा अभ्यास व व्यवस्थित गुंतवणूक (म्हणजे सट्टा नव्हे) केली तर हेही शक्य आहे, हे आजच्या जगात सिद्धही झाले आहे. सन्नाथची भरधाव गाडी थोडी थांबली तेव्हा अनेकांनी आपापली समीकरणे मनात जुळवायला सुरुवात केली होती!
vinayak-signature
विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com