मुंबई : मुंबई महापालिकेतील दोन हजार १९८ अधिकारी – कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली असून त्यापैकी १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार १५० जण बरे झाले आहेत. मृतांमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांची संख्या अधिक आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना १० टक्के उपस्थिती असताना पालिका कर्मचाऱ्यांना ५० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू पालिका कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली. पालिकेची रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्रातीलच नव्हे, तर अन्य विभागातील अधिकारी-कर्मचारी करोनाविरोधातील लढाईत सक्रिय आहेत. प्रतिबंधित क्षेत्र, करोना काळजी केंद्रे, विलगीकरण कक्ष आदी ठिकाण दोन वेळ जेवण वितरणाची जबाबदारी करनिर्धारण व संकलन विभागावर सोपविण्यात आली. या लढाईमध्ये सहभागी झालेल्यांपैकी दोन हजार १९८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली असून त्यापैकी एक हजार १५० कर्मचारी उपचाराअंती बरे झाले. मात्र १०३ अधिकारी – कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले.