निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही घटकाला नाखुश ठेवणे परवडणारे नसत़े  त्यामुळेच विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांबरोबरच गेल्या वर्षी रब्बी हंगामात फटका बसलेल्या शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत वाटावी लागणार असून, ही रक्कम देण्यासाठी अन्य खात्यांच्या आर्थिक तरतुदींमध्ये कपात करण्याची
वेळ सरकारवर येणार अशी चिन्हे आहेत.  
गेल्या महिन्यात विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे सहा लाख हेक्टर्स शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सुमारे ७५० कोटी रुपयांची मदत वाटावी लागणार आहे. याशिवाय गेल्या वर्षी रब्बी हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचे पैसे अद्याप वाटण्यात आलेले नाहीत. ही एकूण रक्कम सुमारे १५०० कोटींच्या आसपास असून, ही रक्कम कशी उभी करायची, हा प्रश्न सध्या कृषी विभागाला पडला आहे.  विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने मदत वाटपात काही गडबड झाल्यास त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल, अशी काँग्रेस नेत्यांना भीती आहे.
विदर्भात शेतकऱ्यांच्या मदतीची रक्कम वाटण्यास लगेचच सुरुवात करावी, असा प्रस्ताव कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडला आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे आधीच शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच विरोधकांनी मदतीवरून वातावरण तापविण्यास सुरुवात केल्याने काँग्रेसचे नेते सावध झाले आहेत. विरोधकांच्या आंदोलनानंतर मदतीचे वाटप झाल्यास त्याचे सारे श्रेय विरोधी पक्षाला जाईल. यापेक्षा काही प्रमाणात मदतीचे वाटप सुरू झाल्यास सरकारच्या विरोधातील नाराजीची तीव्रता आपोआपच कमी होईल, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.