करोनाच्या आणखी १ हजार ३५४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ९० हजारांच्या पुढे गेला आहे. तर ४८ तासांत ७३ रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या ५ हजार २०२ वर गेली आहे. मुंबईतील करोनामुक्त रुग्णांची संख्या ६८ टक्के  आहे.

मुंबईतील करोना बाधितांची संख्या सतत वाढत असून शुक्रवारी १ हजार ३५४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा ९० हजार १४९ वर गेला आहे. तर एकाच दिवसात २ हजार १८३ एवढय़ा मोठय़ा संख्येने रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत ६१ हजार ९३४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या २२ हजार ७३८ सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. मृत पावलेल्या ७३ रुग्णांपैकी ५८ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तर ५५ रुग्णांचे वय ६० वर्षांवरील होते.

गंभीर रुग्णांची संख्या वाढली 

सक्रीय २२ हजार ७३८ रुग्णांपैकी १४ हजार ८७९ रुग्णांना लक्षणे नाहीत तर ७ हजार ८९२ रुग्णांना लक्षणे आहेत. तर १ हजार १४४ रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

२७५ मृत्यू अन्य कारणाने

जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच ‘नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल‘ यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चपासूनच्या विविध मृत्यू प्रकरणांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. तसेच अनेक रुग्णालयांकडे प्रलंबित असलेली मृतांची आकडेवारीही समाविष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या महिन्याभरात सुमारे ३ हजार मृत्यू समाविष्ट करण्यात आले आहेत. मात्र एप्रिल ते जूनच्या मध्यापर्यंत झालेले २७५ मृत्यू हे अन्य कारणांमुळे झाले असल्याचे पडताळणी समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे ही संख्या सक्रीय रुग्णांच्या आकडेवारीतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे सक्रीय रुग्णांचा आकडा आणखी कमी झाला आहे.

देशात २४ तासांमध्ये २६ हजार ५०६ रुग्ण

गेल्या चोवीस तासांमध्ये करोना रुग्णांमध्ये २६ हजार ५०६ इतकी विक्रमी वाढ झाली असून एकूण रुग्णसंख्या ७ लाख ९३ हजार ८०२ वर पोहोचली आहे. देशात गुरुवारी दिवसभरात ४७५ मृत्यू झाले असून एकूण मृत्यूची संख्या २१ हजार ६०४ इतकी झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात २४ तासांत ५३ जणांचा मृत्यू

जिल्ह्यत करोना रुग्णांची संख्या रोज नवे उच्चांक गाठत असून शुक्रवारी दिवसभरामध्ये तब्बल २ हजार ६४ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा आता ५० हजार ९२० इतका झाला आहे. तर, शुक्रवारी जिल्ह्यत ५३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकुण संख्या १ हजार ५०७ झाली.