सध्या देशात आणि राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. तसंच मुंबईतही करोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. दुसरीकडे करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून गर्दी टाळण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. गणेशोत्सवापाठोपाठच दहीहंडी उत्सवावरही करोनाचं सावट पसरलं आहे. दहीहंडीला होणारी मोठी गर्दी पाहता भाजपा नेते राम कदम यांनी आपला दहिहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

घाटकोपर परिसरात राम कदम यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन केलं जातं. तसंच अनेक पथकं या ठिकाणी हंडी फोडण्यासाठी येत असतात. परंतु यावेळी करोनाचं संकट पाहता राम कदम यांनी हा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

“करोनाचे संकट पाहता आणि दहीहंडीला हजारो लोकांची जमा होणारी गर्दी लक्षात घेता, घाटकोपरमघ्ये होणारी आमची देशातील सर्वात मोठी दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत आहे, असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गेल्यावर्षीही दहीहंडी केली होती रद्द

गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच या पुरात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर राम कदम यांनीदेखील दहीहंडीचा उत्सव रद्द करून त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. तसंच त्यांनी इतर दहीहंडी आयोजकांनाही सोहळा रद्द करण्याचं आवाहन केलं होतं. तसंच दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा करत संपूर्ण निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे आवाहनही केलं होतं.