मुंबई : आगामी शैक्षणिक वर्षात थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात आले असून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे विषय अनिवार्य असणार नाहीत. विज्ञान शाखेतील निश्चित केलेले कोणतेही तीन विषय घेऊन बारावी झालेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतील.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पदविकेच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी प्रवेशासाठी गणित, भौतिकशास्त्र या विषयांची सक्ती मागे घेतली. त्याऐवजी दिलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी झालेल्या विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरवण्यात आले. परिषदेचा हा निर्णय वादग्रस्त ठरला. त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना असल्याचे परिषदेने सांगितले. आता राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी पदविका प्रवेशाबाबत परिषदेच्या निर्णयाची री ओढली आहे. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य असणार नाही. त्याचप्रमाणे पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात आर्थिक मागास प्रवर्गासाठी (ईडब्ल्यूएस) राखीव जागातील रिक्त जागा दुसऱ्या वर्षीदेखील थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी ईडब्ल्यूएससाठी आरक्षित राहाणार आहेत.

प्रथम वर्षासाठी प्रवेश परीक्षा नाही…

पदविकेच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा होणार नाही. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकालाचे गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे त्या आधारेच दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण मराठी भाषेमध्ये शिकण्याचा पर्याय यावर्षी राज्यात पहिल्यांदाच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

शुल्क निश्चिती समितीची नियुक्ती…

महाराष्ट्र विना अनुदानीत खाजगी व्यवसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क विनियमन ) अधिनियम-२०१५ नुसार उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विजय लखीचंद आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्चिती समिती नियुक्त करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय खोले, सनदी लेखापाल मनोज चांडक, परिव्यय लेखापाल रत्नाकर फडतरे, व्यावसायिक शिक्षण तज्ज्ञ धर्मेंद्र मिश्रा, यांची या समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

होणार काय?

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयांसह गणित किंवा जीवशास्त्र यांपैकी एक विषय घेऊन बारावी परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे, अशी अट होती. ती आता बदलून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये बारावीत भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, जीवशास्त्र, कृषी, अभियांत्रिकी ग्राफिक्स आदी विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाले असल्यास अशा विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

कश्मिरी पंडितांसाठी राखीव जागा

पदविका शिक्षण संस्थांमध्ये काश्मिरी विस्थापितांबरोबरच, काश्मीरमधून विस्थापित न होता काश्मीर खोऱ्यांमध्ये राहात असलेल्या काश्मिरी पंडित, काश्मिरी हिंदू कुटुंबे आणि ज्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र आहे, अशा उमेदवारांना प्रवेशासाठी राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ‘महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमाक्षेत्रातील उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरताना तसा उल्लेख असणारे प्रमाणपत्र जोडावे लागत होते. या प्रमाणपत्रातील ‘विवादित सीमा क्षेत्रामधील’ या शब्दामुळे अडचणी येत होत्या.आता या प्रमाणपत्रातील ‘विवादित’ शब्द काढून टाकण्यात येणार आहे.