पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारकाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी २९ कोटी रुपयांचा निधी महापालिकेने अर्थसंकल्पात राखीव ठेवला आहे. तो या पुरातन वारसा वास्तूच्या दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. चैत्यभूमीच्या भिंती आणि छपराच्या सिमेंटच्या गिलाव्याची पडझड होऊ लागल्याने तिच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या वास्तूचा मुख्य आधार असलेल्या खांबानाही भेगा पडत असल्याचे निदर्शनास आले होते. परिणामी ही वास्तू धोकादायक बनू लागल्याने अखेर तिच्याबाबत योग्य धोरणात्मक निर्णय घेण्याचे साकडे मुंबई महापालिकेने राज्य सरकारला घातले होते. त्याबाबत चैत्यभूमीच्या पुनर्बांधणीसाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात आल्याचे पालिकेला २१ नोव्हेंबर २०१९ पत्र पाठवून कळविण्यात आले होते. मात्र त्यावर गेले वर्षभर कार्यवाही झाली नव्हती. याबाबत ‘पडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र’ या मथळ्याखालील वृत्त ‘लोकसत्ता’ने २८ सप्टेंबर रोजी प्रकाशित केले. यानंतर महानगरपालिकेने चैत्यभूमीच्या दुरुस्तीचे काम अर्थसंकल्पीय तरतुदीतून तातडीने सुरू करावे अशी मागणी स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी केली. याबाबत स्थायी समितीने निर्णय घेऊन या पुरातन वास्तूच्या जतनाचे कार्य सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी २९ कोटी रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद केली असून या निधीचा विनियोग करून त्वरित दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी आराखडे, संकल्पचित्र बनविण्याचे कार्य हाती घ्यावे. तसेच या कामाच्या प्रगतीबाबत पुढील बैठकीत प्रशासनाला निवेदन करावे, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.