आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची शिवसेनेच्या घोषणेची दखल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी दावोसला गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे दिसते. त्यांनी (शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे) अनेक गोष्टी बोलल्या आहेत. पण सध्या तरी आमची युती आहे, आणि हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास फडणवीस यांनी दावोस येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज (मंगळवार) मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा ठराव एकमताने झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणात यापुढे शिवसेना देशातील सर्व निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले. दावोसला गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या भाषणात अनेक गोष्टी बोललेल्या आहेत. वाट पाहूयात.. सध्या तरी मी यावर जास्त बोलणार नाही. पण आमचे युतीचे सरकार सध्या आहे, आणि हे सरकार पाच वर्षांचा आपला कालावधीही पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी, आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास़्त्र सोडले. हिंदू मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेने अन्य राज्यात निवडणूक लढवली नाही. मात्र आता शिवसेना प्रत्येक राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवेल, असे त्यांनी सांगितले. गाई मारणं जसं पाप आहे तसंच थापा मारणं पण पाप आहे, असं सांगत थापा मारण्यावर पण बंदी घालायला हवी असा टोला ही त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला होता.