सुशांतसिंह प्रकरणातून बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबीने काही लोकांना अटक केली. आता बॉलिवूडमधील काही कलाकारांची चौकशी होत असताना या प्रकरणाशी संबंधित असलेल्या भारतीय जनता पार्टी-बॉलिवूड-सँडलवूड-गोवा ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी का करत नाही? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रिय व्यक्ती राकेश अस्थाना महासंचालक असलेल्या एनसीबीच्या चौकशीवर आणखी प्रश्नांचा भडीमार करत सावंत पुढे विचारतात की, भाजपाचे बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला दुर्लक्ष करु देणार नाही. एका ५९ ग्रॅम गांजाप्रकरणी एनसीबी एवढा मोठा गाजावाजा करत असताना याचवेळी कर्नाटकमध्ये भाजपचा कार्यकर्ता चंद्रकांत चौहानला १२०० किलो गांजासह अटक करण्यात आली याकडे त्यांनी ढुंकूंनही पाहिले नाही.

कर्नाटकात अभिनेत्री रागिनी द्विवेदी हीला सँडलवूड ड्रग रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली. अभिनेत्री रागिनी ही कर्नाटक भाजपाची स्टार प्रचारक होती. याच प्रकरणात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आदित्य अल्वा या व्यक्तीलाही अटक करण्यात आली. अल्वा हा गुजरात भाजपाचा स्टार प्रचारक अभिनेता विवेक ओबेरॉयचा सख्खा मेव्हणा आहे आणि विवेक ओबेरॉय हा मोदी बायोपिकचा निर्माता संदीप सिंहबरोबर सहनिर्माता आहे आणि मोदींची मुख्य भूमिकाही विवेकनेच साकारली आहे. विवेक हा संदीप सिंहच्या निर्मिती कंपनीत भागीदार आहे.

आणखी वाचा- कंगना ऑफिस तोडफोड प्रकरणी संजय राऊत यांना उत्तर देण्यास कोर्टाने दिली मुदतवाढ

गुजरात राज्य सरकारने संदीप व विवेकच्या कंपनीबरोबर १७७ कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला. या मोदी बायोपीकचे पोस्टर रिलीज हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास उपस्थितीत करण्यात आले होते. याच संदीपसिंहने भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन कोणाला केले होते आणि संदिपसिंहला मॉरिशसमध्ये एका प्रकरणात कोणी मदत केली होती याचा खुलासा अद्याप झालेला नाही. हे सर्व एकमेकाशी संबंधीत आहे. महाराष्ट्र सरकारने या संबंधाची माहिती सीबीआयला दिलेली आहे. परंतु आजपर्यंत या अँगलचा तपास का केला नाही, याचे आश्चर्य आहे.

एनसीबी ड्रग कनेक्शनची पाळंमुळं शोधत असताना गौरव आर्याचे भागीदार कोण आहेत आणि गोवा अँगल या तपासातून गायब झालेला दिसत आहे. याचे उत्तर एनसीबीने दिले पाहिजे.

आणखी वाचा- “इतके जवान पाकिस्तानने पुलवामा हल्ल्यात मारले नव्हते,” भिवंडी दुर्घटनेवरुन कंगनाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

एनसीबीच्या ड्रग कनेक्शन चौकशीतून कंगना रणौत गायबच आहे. आपण ड्रग्ज घेत होतो असे तिने स्वतः कबुल केले आहे. कंगनाचा ड्रग घेतल्यासंदर्भातील व्हिडीओ हा पुरावा आहे, असे असताना तिची चौकशी का केली जात नाही. ही चौकशी सुरु असताना कंगना मुंबईत येऊन काही दिवस राहून परत शिमल्याला गेली पण चौकशीसाठी एनसीबीने तीला का बोलावले नाही? एनसीबी कंगनावर मेहरबान आहे का? का कंगना बॉलिवूडचा भाग नाही? एनसीबी व्हॉट्सअप चॅटवरून चौकशीसाठी बोलावत असेल तर कंगनाच्या व्हिडिओकडे डोळेझाक का ?, अशी विचारणा सावंत यांनी केली आहे.