लोकांनी गर्दी कमी केली नाही तर मुंबई लोकल बंद करावी लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. “मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे खासगी कंपन्यांना घरुन काम करण्याची मुभा देण्याची विनंती केली आहे. गरज पडल्यास ५० टक्क्यांपेक्षा कमी लोकांनाच कार्यालयात बोलवा असं सांगितलं आहे. सरकारी कार्यालयातही ५० टक्क्यांपेक्षी कमी लोकांनी काम करावं असा निर्णय घेत आहोत. जेणेकरुन सार्वजनिक वाहतूक सेवेवर ताण कमी पडावा. त्या अनुषंगाने मह्त्तावाचे निर्णय घेत आहोत. मुंबईच्या लोकांनी ऐकलं नाही तर बस आणि ट्रेन सेवा १० ते १२ दिवसांसाठी जनहितार्थ बंद करावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

आणखी वाचा- करोनाची लक्षणं आढळलेल्यांचीच चाचणी होणार – आरोग्यमंत्री

राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, महाराष्ट्रात ४२ करोना रुग्ण आहेत. आतापर्यंत ८०० टेस्ट झाल्या असून त्यापैकी ४२ पॉझिटिव्ह सापडले आहेत. उर्वरित सर्व निगेटिव्ह आहेत. परदेशातून आलेल्यांचीच चाचणी केली जात आहे. तसंच राज्यात आणखी काही लॅब, हॉस्पिटल सुरु करणार आहोत”. अत्यावश्यक सेवा बंद करणार नाही आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी सांगितलं की, “अत्यावश्यक सेवा कुठल्याही स्थितीत बंद करणार नाही. परंतु अनावश्यक व्यवहार बंद करायला हवेत. पालिकांशी संपर्क साधून ज्वेलर्स, कपड्यांसारखी सारखी दुकानं बंद ठेवण्याचे सांगण्यात येणार आहे”.

आणखी वाचा- ज्वेलर्स, कापडांची दुकानं बंद ठेवण्यात येणार; राज्य सरकारनं केलं स्पष्ट

“सोसायटीतल्या लोकांनी रूग्णांशी माणुसकीला धरून वर्तन करावे. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देणं योग्य नाही. करोनाचा आजार हा उपचार घेऊन बरा होणारा आहे. त्यामुळे रूग्ण आढळल्यास त्यांना १४ दिवसांचं विलगीकरण करावं, उपचार करावेत. बाहेरच्या देशातून आलेल्यांची व लक्षणे आढळलेल्यांचीच टेस्ट करणार आहोत. उपचार सुरू असणाऱ्या रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. सगळ्यांच्या सहकार्यानं करोनावर मात केली जाऊ शकते,” असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला.