मुंबईतील चर्नी रोड अर्थात गिरगाव या ठिकाणी राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छा मरणाची मागणी केली आहे. नारायण लवाटे आणि इरावती लवाटे अशी या दोघांची नावे आहेत. नारायण लवाटे हे सध्या ८६ वर्षांचे आहेत तर इरावती लवाटे या ७९ वर्षांच्या आहेत. मागील काही वर्षांपासून त्यांनी ही मागणी लावून धरली आहे. मात्र त्यांना याबाबत काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आता थेट राष्ट्रपतींनाच पत्र लिहिले आहे. लग्नाच्या पहिल्याच वर्षी आम्ही दोघांनीही मूलाला जन्म द्यायचा नाही असा निर्णय एकमताने घेतला. त्यामुळे आम्हाला कोणीही वारस नाही. अनेक वर्षे सोबत सुखाने जगलो आता आम्हाला सोबत मृत्यू मिळावा म्हणून आम्ही इच्छा मरणाची मागणी केली आहे असे या दोघांनी म्हटले आहे. 'हिंदुस्थान टाइम्स'ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. इच्छामरणाचा कायदा व्हावा म्हणून हे दाम्पत्य ३० वर्षे पाठपुरावा करते आहे. नारायण लवाटे हे एस.टी. महामंडळाच्या अकाऊंट विभागात कार्यरत होते. तर इरावती लवाटे या गिरगावातील आर्यन हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या. आता दोघेही गिरगावातील ठाकूरद्वार भागात असलेल्या चाळीत राहतात. निवृत्तीचे जीवन जगतात. दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ केली आता मृत्यू येणार हे अटळ आहे मात्र त्याची वाट न पाहता तो आम्हाला सोबत यावा अशी इच्छा या दोघांनीही व्यक्त केली आहे. भारतातील न्याय व्यवस्था इच्छामरणाला परवानगी देत नाही. मात्र अंथरूणाला खिळून कुणावर तरी त्याचा बोजा पडण्याआधी आम्हाला मृत्यू हवा आहे अशी मागणी या दोघांनी केली आहे. इच्छामरणाचा हक्क मिळायला हवा अशी मागणी करणारे पत्र आम्ही राष्ट्रपतींना लिहिले आहे असे लवाटे दाम्पत्याने म्हटले आहे. इरावती लवाटे यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, मात्र त्या आजही घरातली जबाबदारी समर्थपणे सांभाळतात. २०११ मध्ये केईएम रूग्णालयात असलेल्या अरूणा शानबाग यांना दयामरण देण्यासाठी त्यांची मैत्रीण पिंकी विराणी यांनी यांनी याचिका दाखल केली होती. त्यावेळी दयामरण आणि इच्छामरण हे दोन मुद्दे चर्चिले गेले होते. मात्र केईएम रूग्णालयाच्या परिचारिका आणि डॉक्टर यांनी अरूणा शानबाग यांना दयामरण देऊ नये त्या जोपर्यंत जिवंत आहेत आम्ही त्यांची काळजी घेऊ असेही म्हटले होते. त्यामुळे तसेच भारतात इच्छामरण बेकायदेशीर असल्यानेच सुप्रीम कोर्टाने पिंकी विराणींची याचिका फेटाळली होती. मात्र गिरगावात राहणाऱ्या लवाटे दाम्पत्याने इच्छा मरणासंदर्भात राष्ट्रपतींनाच पत्र लिहिले आहे अशी माहिती समोर आली आहे.