ठाणे कोपरी परिसरालगतच्या धर्मवीर नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या यश यशवंत साळवी या १४ वर्षीय मुलाचा बुधवारी दुपारी विजेचा जोरदार धक्का लागून मृत्यू झाला. या झोपडपट्टीत मोठय़ा प्रमाणावर पक्की बांधकामे झाली असून घरांबाहेर लोखंडी शिडय़ा लावण्यात आल्या आहेत. यापैकी एका लोखंडी शिडीत विद्युत प्रवाह उतरला होता. तेथेच खेळणाऱ्या यशचा या शिडीला स्पर्श झाल्याने त्याला जबरदस्त धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर यशला भाऊ चंद्रकांत याने तात्काळ ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यशने इयत्ता आठवीची परीक्षा दिली होती. सुटी असल्याने तो घरी होता. याप्रकरणी  प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसात नोंद करण्यात आली आहे. यशच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे याचा पोलीस तपास करत असून त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, ठाण्यातील अनेक झोपडपट्टयांमध्ये वाढीव बांधकामे करताना वीज वितरण व्यवस्था सदोष झाली आहे. त्यामुळेच शिडीत वीज उतरल्याची शक्यता व्यक्त होत आहे.