धनगर समाजाबाबत केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षाबाबत ‘व्हॉटस् ॲप’वर व्हायरल झालेला संदेश हा खोटा असल्याचे टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसकडून राज्य सरकारला कळविण्यात आले आहे. या संदेशात टाटा समाज विज्ञान संस्थेच्या (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) लोगोचा गैरवापर करण्यात आल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. राज्यातील ‘धनगर’ ही भटकी जमात व ‘ओराओन, धनगड’ या अनुसूचित जमातीबाबत अभ्यासपूर्वक संशोधनाचे काम २२ सप्टेंबर २०१५ च्या शासन पत्रान्वये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या स्वायत्त संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांच्यामार्फत ‘धनगर’ ही भटकी जमात व ‘ओराओन, धनगड’ या अनुसूचित जमातीबाबत सामाजिक मानवशास्त्रीय अभ्यास संशोधनाचे काम सुरु आहे. या संस्थेकडून त्यांचा अंतिम अहवाल डिसेंबर २०१७ पर्यंत शासनास सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप कोणताही अहवाल त्यांच्याकडून शासनाला प्राप्त झालेला नाही. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेने धनगर समाजाबाबत केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षाबाबत चुकीच्या स्वरुपाचा संदेश रविवारपासून 'व्हॉटस् ॲप' वर व्हायरल झाला आहे. ही बाब सोमवारी, ७ ऑगस्ट २०१७ रोजी ई-मेलव्दारे शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्यावतीने कार्यासन अधिकारी सु. सी. पाटील यांनी हा खुलासा केला आहे.