करोनाचा कहर सुरु झाल्यापासून आज पहिल्यांदाच धारावीत करोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. मुंबईतल्या धारावीत करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले होते. त्यामुळे मुंबईकरांचं धाबं दणाणलं होतं. मात्र धारावीत करोनाचा संसर्ग संपवण्यासाठी विशेष मॉडेल राबवण्यात आलं. या धारावी मॉडेलची दखल जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO नेही घेतली आहे. अशात मागील चोवीस तासात धारावीत करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे धारावीसाठी ही बाब निश्चितच समाधानकारक आहे.

मुंबईतील धारावी परिसरात करोना चाचणी, रुग्णांचा शोध घेणं, सोशल डिस्टन्सिंग आणि संसर्ग झालेल्या रुग्णांवर त्वरित उपचार केल्यामुळे करोनाविरोधातील लढाईत यश मिळालं. रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. आता कौतुकाची बाब म्हणजे गेल्या २४ तासांमध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. धारावी मॉडेल यशस्वी झाल्यानंतर असंच मॉडेल मालेगावातही राबवण्यात आलं होतं. रुग्णांचा शोध घेणं, सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व लोकांना समजावून सांगणं तसेच लक्षणं दिसल्यावर वेळीच उपाय करणं या मॉडेलमुळे फायदा झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही स्पष्ट केलं होतं.

धारावीसारख्या परिसरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो अशी चिंता सर्वच स्तरातून व्यक्त करण्य़ात आली होती. काही जणांकडून सुरूवातीची संख्या पाहता धारावीचा ‘वुहान’ असाही उल्लेख करण्यात आला होता. परंतु त्यानंतर प्रशासनानं त्वरित या ठिकाणी आयसोलेशनची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या लोकांसाठी आयसोलेशनची व्यवस्था केली. तसंच सामूहिक शौचालयाची समस्याही दूर करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाचण्याही वाढवण्यात आल्या. त्यामुळे धारावीसारख्या परिसरातील रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश आलं.