मुंबईतील इमारत दुर्घटनांचं सत्र सुरूच आहे. गेल्या आठवड्यात चेंबूर आणि गोवंडीत मोठ्या दुर्घटना घडल्या. या घटनांच्या आठवणी ताज्या असतानाच अंधेरीत बांधकाम सुरू असलेली एक चार मजली इमारत घरांवर कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ५ जणांना अग्रिशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेत बाहेर काढलं. जखमींवर उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मुंबईत मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरी पश्चिममधील जुहू गल्ली परिसरातील मेहता बाबा चाळ ही चार मजली इमारत कोसळली. चार मजली इमारती बांधकाम सुरू होतं. मध्यरात्री अचानक ही इमारत बाजूला लागून असलेल्या घरांवर कोसळली. त्यानंतर ढिगाऱ्याखाली ५ जण दबले गेले. या दुर्घटनेत सुदैवाने कुणाचीही मृत्यू झाला नाही. पण, पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना कुपर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचा जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य हाती घेतलं. त्यामुळे जीवित हानी टळली. जवानांनी तीन ते चार तासांमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढलं. अकबर शेख (६०), चांद शेख (३४), अरिफ शेख (१७) आणि अजरा शेख (१८) अशी जखमींची नावं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर समशुद्दीन शेख (५०) यांना उपचारांनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.