करोना साथरोगाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दुधाची २५ रुपये प्रति लिटर दराने खरेदी करणार आहे. येत्या चार-पाच दिवसांत हे संकलन सुरू होईल आणि करोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरू राहील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दूध व्यवसाय, दूध उत्पादक शेतकरी संकटात आहेत. दूधविक्री घटल्यामुळे गावागावांत दूध स्वीकारले जात नाही. राज्यात उत्पादित १२ लाख लिटर दुधापैकी १० लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खासगी बाजारात दुधाचा दर १५ ते १७ रुपये प्रति लिटपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. या संदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तसेच करोनाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असलेले १० लाख लिटर दूध दूध संस्थांच्या माध्यमातून शासन २५ रुपये प्रति लिटर दराने खरेदी करेल. त्या दुधाची भुकटी करून ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाइन विक्री केली जाईल, असे पवार यांनी सांगितले. राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, यासाठी साधारणपणे २०० कोटी रुपये निधी लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, दुग्धविकासमंत्री सुनील केदार (दूरध्वनीद्वारे), वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह वरिष्ठ अधिकारी तसेच दूध महासंघाचे व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.