भारतीय स्वातंत्र्यलढय़ात १९४२ साली इंग्रजांच्या गोळीबारात हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्म्यांच्या वारसांना तातडीने कृषी पंप वीजजोडणी देत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले आहे. या वेळी १० शेतकऱ्यांनी आपले थकीत कृषी पंप वीज बिल भरण्याचा संकल्प याप्रसंगी जाहीर करत वीज बिलही भरले. ८ सप्टेंबर १९४२ रोजी वडुज तहसील कचेरीवर काढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मोर्चावर इंग्रजांनी केलेल्या अमानुष गोळीबारात खटाव तालुक्यातील वडगाव (ज. स्वा.) येथील ७ जण हुतात्मा झाले होते. त्यातील हुतात्मा आनंद गायकवाड व रामचंद्र सुतार यांच्या नातवांनी महावितरणकडे नुकताच शेती पंपाच्या वीजजोडणीसाठी अर्ज केला होता. त्याची दखल घेत हुतात्म्यांच्या वारसांना तात्काळ वीजजोडणी देण्याच्या सूचना डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिल्या. ‘कृषी धोरण-२०२०’अंतर्गत सातारा जिल्ह्य़ात कृषी वीजजोडणी देण्यास सुरुवात करण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे स्वत: वडगाव (ज. स्वा.) येथील हुतात्म्यांच्या बांधावर गेले. वीजजोडणीचा शुभारंभ केला. याप्रसंगी १० शेतकऱ्यांनी तातडीने वीज बिल भरून, थकबाकीमुक्त होण्याचा संकल्प केला.