तपास यंत्रणेद्वारे दुर्घटनांना आळा घालणे शक्य

रस्ते अपघातात विविध कारणांमुळे अनेक वाहनचालकांसह सहप्रवाशांना प्राण गमवावे लागल्याच्या घटना महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात घडतात. मात्र अपघात झाल्यानंतर त्याच्या मूळ कारणांचा तपास न झाल्याने पुन्हा ‘त्याच ठिकाणी’ अपघातांचा धोकाही संभवतो आणि अपघातांना आळा घालणे शक्य होत नाही. रस्ते अपघातांना आळा घालता यावा यासाठी त्याच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी ‘स्वतंत्र तपास यंत्रणा’ स्थापन करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.

राज्यात रस्ते अपघातात मोठय़ा प्रमाणात प्राणांतिक अपघाताबरोबरच गंभीर जखमींचे प्रमाणही अधिक आहे. एखाद्या मोठय़ा अपघातात तर चारपेक्षा जास्त जण मृत्यू होत असतात. राज्यातील अपघातांची माहिती घेतल्यास २०१६ मध्ये एकूण ३९ हजार ८७८ अपघात झाले असून १२ हजार ९३५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर २०१७ मध्ये एकूण ३२ हजार ४७७ अपघात झाले आणि यामध्ये ११ हजार ०२ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या घटना घडल्यानंतर त्याचे मूळ कारण कधीच पुढे येत नाही. बेदरकारपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालविणे अशी नेहमीची आणि वरवरची अनेक कारणे तपास करणाऱ्या यंत्रणांकडून पुढे केली जातात. त्यानंतरचा तपास पूर्णपणे थांबतो.

अपघातांना पूर्णपणे आळा न बसता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होत राहते. त्यामुळे अपघातांना आळा बसावा यासाठी अनेक उपाययोजनांचा विचार परिवहन विभागाकडून केला जात आहे. यामध्ये एखादा मोठा अपघात झाल्यास त्याच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी ‘स्वतंत्र तपास यंत्रणे’चा विचार होत आहे. ही तपास यंत्रणा जिल्हास्तरावर स्थापन करून त्यात तज्ज्ञांचा समावेश केला जाईल. अपघात होताच यंत्रणेकडून त्वरित घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली जाईल आणि त्यावर सविस्तर काम करून त्याचा अहवाल तयार करेल अशी त्यामागील संकल्पना आहे. या अहवालानुसार उपाययोजना केल्या जातील, असे सांगण्यात आले.

  • सध्या रेल्वेत एखादा प्राणांतिक अपघात झाल्यावर त्याचा तपास करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त असतात. तर विमानाचा अपघात झाल्यावरही त्याचा स्वतंत्रपणे तपास होतो. परंतु रस्ते अपघातांच्या बाबतीत तसे होत नसल्याने अपघातांना आळा बसत नाही. सध्या प्राथमिक स्तरावरच असलेल्या या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी बराच कालावधीही लागू शकतो, असेही सांगण्यात आले. त्यासाठी मोठी यंत्रणा उभारावी लागेल.
  • राज्यात २०१७ मध्ये एकूण ३२ हजार ४७७ अपघात झाले आहेत. यामध्ये १० हजार ९५ अपघातांमध्ये तर ११ हजार २१ जणांनी जीव गमावला आहे. यात सर्वाधिक पुणे ग्रामीण भागात ९४२, अहमदनगरमध्ये ७१२, नाशिक ग्रामीणमध्ये ६५२, पालघरमध्ये ४४६, सोलापूर ग्रामीणमध्ये ४४२ तर मुंबईत ३९७ जणांचा मृत्यू झाला आहे.