मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना रणौत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल झाली आहे. कंगना आणि शिवसेना असा वाद पेटला असतानाच बृह्नमुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. त्यावर राज्यपालांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कंगना व राज्यपाल कोश्यारी यांची भेट होत आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आक्रमक टीका करणारी अभिनेत्री कंगना रणौतवर मुंबई व मुंबई पोलिसांविषयी केलेल्या विधानानंतर टीकेची झोड उठली होती. त्यावरून कंगना विरुद्ध संजय राऊत असं शाब्दिक युद्धही बघायला मिळालं होतं. त्यातच महापालिकेनं अनधिकृत बांधकाम केल्याच्या प्रकरणात कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. त्यामुळे कंगना भडकली होती. कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कंगनानं आज राज्यपालांची भेट घेतली. यावेळी कंगनाची बहीणही उपस्थित होती. राज्यपालांच्या भेटीनंतर बोलताना कंगना म्हणाली,"राज्यपालांना मी एक नागरिक म्हणून भेटले. माझ्यासोबत जे घडलं, ते त्यांना सांगायला आले होते. त्यांनी माझं म्हणणं मुलीप्रमाणं ऐकून घेतलं. मला राजकारणाशी देणंघेणं नाही. मला आशा आहे की, न्याय मिळेल," असं कंगनानं सांगितलं. Mumbai: Actor Kangana Ranaut and her sister Rangoli meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan pic.twitter.com/48B3TTf6Cf — ANI (@ANI) September 13, 2020 या ट्विटमुळे पडली होती वादाची ठिणगी राम कदम यांच्या ट्विटवर बोलताना कंगनानं हे ट्विट केलं होतं. “सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफिया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय…त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी कंगनावर टीका केली. राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कंगनानं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.