मुंबई : चौधरी चरणसिंहांची हजेरी घेणारे नानाजी, जेआरडी टाटांना आपल्या रचनात्मक कामाचं महत्त्व पटवून देणारे नानाजी, सत्तेतल्या भल्याभल्यांना खडे बोल सुनावून कापरे भरविणारे नानाजी, जयप्रकाशजींची सेवा करणारे नानाजी, राजकारणातले चाणक्य नानाजी, पोलादी पुरुष नानाजी, इंदिरा गांधींच्या नजरेतून ‘खतरनाक’ असलेले नानाजी, संध्याकाळी एखाद्या शेतकऱ्याच्या घरात घोंगडीवर बसून त्याच्याशी गप्पा मारणारे नानाजी आणि.. रात्री प्रवासातून परतल्यावर आपल्या खोलीतील जमिनीवर लहानशा गादीवर पहुडताच, निरागसतेने शांत झोपी जाणारे नानाजी.. आणीबाणीच्या काळात संघर्ष करणाऱ्यांना पाठबळ देणारे नानाजी आणि वयाची मर्यादा लक्षात घेऊन सक्रिय राजकारणातून स्वत:हून निवृत्त होऊन समाजसेवेत स्वत:ला वाहून घेणारे नानाजी.. दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानववाद आणि महात्मा गांधींच्या अंत्योदयाचे स्वप्न एकाच वेळी प्रत्यक्षात आणणाऱ्या एका व्यक्तीची ही असंख्य रूपे.. अशा, उल्लेखनीय बहुआयामी कार्याच्या सन्मानार्थ नानाजी देशमुख यांना गुरुवारी मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी किताबाने गौरविण्यात आले. दीनदयाळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष विरेंद्रजीत सिंह यांनी हा किताब राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वीकारला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील अतिमागास जिल्ह्य़ांत त्यांनी गावविकासाच्या योजना राबवल्या. पाणी आणि सिंचन या क्षेत्रांतही विविध प्रयोग केले. गावविकासाकडे नेणाऱ्या त्यांच्या या कार्याचाच केंद्र सरकारने भारतरत्न देऊन सन्मान केला आहे, अशी कृतज्ञता विरेंद्रजीत सिंह यांनी व्यक्त केली. या गौरवाच्या पाश्र्वभूमीवर नानाजींच्या विचार आणि कार्यावर आधारित विशेष कार्यक्रम दिल्लीत आयोजिला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.